आर्थिक मंदी : केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्यावर मोठी नामुष्की

आर्थिक मंदीच्या प्रश्नावर चौफेर टीका झाल्यानंतर रवी शंकर यांनी आपल्याच विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

Updated: Oct 14, 2019, 07:50 AM IST
आर्थिक मंदी : केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्यावर मोठी नामुष्की title=

नवी दिल्ली : आर्थिक मंदीच्या प्रश्नावर तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कमाईचे दिलेले उदहारण केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मागे घेतले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत आर्थिक मंदीचा मुद्दा खोडून काढण्यासाठी रवी शंकर प्रसाद यांनी तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कमाईचे उदहारण दिले होते. मात्र यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

देशात आर्थिक मंदीची लाट येत असल्याचे निरीक्षण अनेकांकडून वर्तवले असताना केंद्रीय मंत्री रवी शंकर यांनी मात्र या परिस्थितीवर विरोधी भाष्य केले. रवीशंकर प्रसाद यांनी भारतीय अर्थव्यवस्था अगदी सुरळीतपणे कार्यरत असल्याचे मत शनिवारी मांडले. यावेळी त्यांनी आपल्या या वक्तव्याचा सिद्ध करण्यासाठी म्हणून एक अजब उदाहरणही दिले होते. मात्र, हे उदाहरण त्यांना अडचणीचे ठरले. 

महाराष्ट्रातील विधान निवडणुकीच्या  भाजप प्रचारादरम्यान मुंबईत त्यांनी हे वक्तव्य केले होते. तीन चित्रपटांच्या कमाईचा आधार घेत यातून मात्र अर्थव्यवस्थेचे वेगळे चित्र समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. '२ ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी जवळपास १२० कोटींचा गल्ला जमवला. आता अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याशिवाय फक्त या तीन चित्रपटांनी अवघ्या एकाच दिवसात इतकी कमाई कशी केली?, असे ते 'पीटीआय'शी संवाद साधत म्हणाले होते.