'खराब संविधान लागू करणारे लोक...'; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : अमेरिकेमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 24, 2023, 08:18 AM IST
'खराब संविधान लागू करणारे लोक...'; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य
अमेरिकेतील कार्यक्रमात बोलताना केलं विधान

CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवादाच्या विचाराचं कौतुक केलं आहे. सरन्यायाधीशांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देताना, संविधान 'खराब' असलं तरी ते लागू करणारे लोक चांगले असतील तर संविधानही चांगलेच ठरते, असं म्हटलं आहे. भारतामध्ये अगदी मूळापर्यंत रुझलेली वर्णव्यवस्था (जातिवाद) संपवण्यासाठी फायद्याच्या ठरलेल्या आंबेडकरांच्या संविधानवादी विचारांचं कौतुक केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

अमेरिकेतील भाषणात केलं विधान

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे विधान, 'डॉ. बी. आर. आंबेडकरांची अपूर्ण वारसा' या विषयावर बोलताना वरील विधान केलं. रविवारी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये वाल्थम येथील ब्रँडिस विद्यापिठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या अंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. या भाषणामध्ये चंद्रचूड यांनी आंबेडकरांच्या संविधानवादाचं महत्त्व अधोरेखित केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माण करणाऱ्या समितीचे प्रमुख होते.

आंबेडकरांचा वारसाच आधुनिक भारतासाठी दिशादर्शक ठरतोय

आंबेडकरांच्या संविधानावादी विचारसणीमुळे मूळापर्यंत रुझलेली वर्णव्यवस्था नष्ट करुन भारतीय समाजाला बदलण्यासाठी आणि मागासलेल्या समाजातील व्यक्तींचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सशक्तीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम याच विचारांनी केल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. आंबेडकरांचा वारसा आधुनिक भारताच्या संविधानाच्या मूल्यांना आकार देत आहे. हाच वारसा समाजिक सुधारणांसाठी आणि सर्व न्याय सुनिश्चित करण्यासाठी एखाद्या प्रकाशस्तंभासारखा काम करत आहे, असंही सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

'अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप' पुरस्काराने सन्मानित

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आंबेडकरांचा संदर्भ देत महत्त्वाचं विधान केलं आहे. संविधान चांगलं असेल तरी त्याला लागू करणारे लोक 'खराब' असतील तर निश्चितपणे संविधान खराबच असेल, असं आंबेडकरांनी म्हटलं होतं. याचाच दाखला सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात दिला. संविधान खराब असलं आणि त्याला लागू करणारे लोक चांगले असतील तर संविधान चांगलं ठरतं, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. हार्वर्ड लॉ स्कूलच्या 'सेंटर ऑन लीगल प्रोफेशन'ने शनिवारी 'अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप' पुरस्काराने चंद्रचूड यांना शनिवारी सन्मानित करण्यात आलं. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना सन्मानित करण्याची घोषणा 11 जानेवारी 2023 रोजी एका ऑनलाइन कार्यक्रमात करण्यात आली होती.

चंद्रचूड यांचे वडीलही होते सरन्यायाधीश

9 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. धनंजय चंद्रचूड हे शपथ घेतल्यापासून पुढील 2 वर्ष सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्रचूड या पदावरून निवृत्त होतील. धनंजय चंद्रचूड यांचे वडीलदेखील देशाचे सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पूत्र आहेत. वाय. व्ही. चंद्रचूड यांनी 7 वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More