Parliament Security Breach: 'आमचे आई-वडील इतके...'; अटक केलेली तरुणी काय म्हणाली?

Loksabha Security Breach : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या वर्षपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा सुरक्षेत मोठी कुचराई झाली आहे. बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीत उड्या मारल्या होत्या. त्याआधी बाहेर देखील एका महिलेला आणि तरुणाला अटक करण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 13, 2023, 03:17 PM IST
Parliament Security Breach: 'आमचे आई-वडील इतके...'; अटक केलेली तरुणी काय म्हणाली? title=

Loksabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. लोकसभेत दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत बसलेल्या खासदारांमध्ये उडी मारली. त्यावेळी संसदेचे कामकाज सुरू होते. या घटनेनंतर संसद भवनात एकच गोंधळ उडाला. दुसरीकडे संसदेबाहेर दोघांनी स्मॉक गनद्वारे धूर करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यानंतर महाराष्ट्रातल्या अमोल शिंदे आणि हरियाणाच्या नीलम कौर सिंग या महिलेला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नीलम सिंगने मागणी काय होती याबाबत माहिती दिली आहे.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान जे दोन लोक दाखल झाले होते त्या दोघांनी खासदाराच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासमधून प्रवेश केला होता. प्रेक्षक गॅलरीतून एक तरुणाने संसदेत उडी मारली. त्याच्यापाठोपाठ आणखी एका तरुणाने उडी मारली. त्यानंतर त्याने बेचंवरुन उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला. तरुण पायातले बूट काढले पळू लागला. पण तेवढ्यात खासदारांनी त्या तरुणाला पकडले. त्यानंतर काहीच क्षणात दुसऱ्या तरुणालाही पकडण्यात आलं. त्यातील एका तरुणाने बुटातून धुराच्या नळकांड्या काढून फोडल्या.

याशिवाय परिवहन भवनाबाहेर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. 42 वर्षीय नीलम असे महिलेचे नाव आहे. तर त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या तरुणाचे नाव धनराज शिंदे असे आहे. नीलम ही हरियाणातील हिसार येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर तरुण हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. त्यातील नीलमने अटकेनंतर माध्यमांशी संवाद साधताना घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

"माझं नाव नीलम आहे. आपलं भारत सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे. आम्ही जेव्हा हक्काविषयी मागणी करतो तेव्हा आमच्यावर लाठीचार्ज केला जातो. आम्हाला तुरुंगात टाकलं जातं आणि आम्हाला टॉर्चर केले जाते. त्यामुळे आमच्याकडे काही माध्यम नव्हतं. आम्ही कोणत्याही संघटनेतून नाही. आम्ही सामान्य जनता आहोत, विद्यार्थी आहोत. आम्ही बेरोजगार आहोत. आमचे आई वडील इतके काम करतात. पण कोणाचेच म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. हे लोक नेहमीच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात," असे अटक करण्यात आलेल्या महिलेने म्हटलं आहे.