निर्भया प्रकरण : शेवटची इच्छा विचारल्यावर काय म्हणाले दोषी ?

रात्रभर हे चारही आरोपी बैचेन दिसले

Updated: Mar 21, 2020, 05:46 AM IST
निर्भया प्रकरण : शेवटची इच्छा विचारल्यावर काय म्हणाले दोषी ? title=

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणी दोषी अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश सिंह आणि विनय शर्मा यांना दिल्लीतील तिहाड तुरुंगात फाशी देण्यात आली. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे देशभरात स्वागत होत आहे. या निर्णयासाठी निर्भयाची आई आशादेवी गेली ७ वर्षे न्यायालयीन लढा देत होत्या. आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

७ वर्षांच्या कायदेश कालची रात्र दोषींसाठी काळरात्र ठरली. रात्री ते खूपच बैचेन दिसले. चार दोषींपैकी केवळ दोषी म्हणजे मुकेश आणि विनय यांनीच रात्रीचे जेवण केले. दोषींना रात्रभर झोप लागली नाही. ते या कुशीवरुन त्या कुशीवर अशी शरीराची हालचाल करत राहीले. 

दोषींना पहाटे फासावर लटकावण्याच्याआधी नाश्ता करणार का ? असे विचारण्यात आले. पण त्यांनी नाश्ता करण्यास नकार दिला. याआधी फाशीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

फाशी देण्याच्या आधी प्रत्येकाला त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली पण यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारची इच्छा व्यक्त केली नाही.

१६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीमध्ये निर्भयावर बलात्कार झाला होता. या घटनेनंतर सारा देश हादरुन गेला होता. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

दोषींना फासावर लटकवून फाशी द्या अशी मागणी देशभरातून होऊ लागली. अखेर ७ वर्षांनी हा दिवस आला आणि नराधमांना फाशी देण्यात आली. 

उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला. यासाठी मी संपूर्ण देशाचे धन्यवाद मानते. आजचा सुर्योदय हा देशातील मुलींच्या नावे असल्याची प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. २० मार्च हा दिवस निर्भयाच्या नावे, देशातील मुलींच्या नावे लक्षात ठेवला जाईल असेही त्या म्हणाल्या.

जस्टिस आर भानुमती, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे युक्तीवाद केला. 

यावेळी चौघांपैकी एक दोषी पवन याच्या वयाचा मुद्दा सिंग यांनी सुप्रीम कोर्टात मांडला. त्यावर आक्षेप घेत, कनिष्ठ न्यायालय, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही या आधी अल्पवयीन असल्याचा मुद्दा नाकारल्याचं खंडपीठानं सांगितलं. 

तसंच या पूर्वी झालेल्या सुनावणीतलेच मुद्दे आताही मांडले जात असल्याकडेही खंडपीठानं दोषींचे वकील ए पी सिंग यांचं लक्ष वेधलं.

चौघा दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, त्याला तुम्ही कशाच्या आधारावर आव्हान देत आहात असा थेट प्रश्न यावेळी खंडपीठानं विचारला. आणि ही याचिका निकाली काढली. 

त्याबरोबरच दोषींची फाशी टाळण्याचा त्यांच्या वकिलांचा अखेरचाही प्रयत्न फोल ठरला. आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला.