'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला!

अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Updated: Nov 8, 2017, 11:21 PM IST
'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला! title=

मुंबई : अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नोटबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची माफी मागतील का, असा सवाल प्रकाश राजनं उपस्थित केला आहे. तसंच नोटबंदी ही या काळातली सगळ्यात मोठी चूक असल्याचं प्रकाश राज म्हणालाय.

मागच्या वर्षी ८ नोव्हेंबरला अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली. यामुळे समाजातल्या फक्त काही लोकांचाच फायदा झाला. नोटबंदीनंतर बेकायदेशीरपणे काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा आरोपही प्रकाश राजनं केला आहे. नोटबंदीमुळे श्रीमंतांना काळा पैसा पांढरा करायची संधी मिळाली पण असंघिटत कामगारांचं नुकसान झाल्याचं ट्विट प्रकाश राजनं केलंय.

 

याआधी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प का? असा सवाल, प्रकाश राज यांनी उपस्थित केला होता. तसंच मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, असा टोलाही प्रकाश राजनं लगावला.

गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली माहिती नाही... मात्र, त्यांच्या हत्येनंतर विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त केला होता, असं प्रकाश राज यांनी म्हटलं होतं. असे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना समाज माध्यमांवर फॉलो करतात... तरीही नरेंद्र मोदी डोळे बंद करून असल्याचंही प्रकाश राज म्हणाले होते. या गोष्टीची आपल्याला भीती वाटते असं म्हणत, आपला देश कोणत्या दिशेला चाललाय? असा सवालही प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात उपस्थित केला होता.