'ते शत्रूचा खात्मा करता करता शहीद झाले; हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही'

पंतप्रधानांचा चीनला थेट इशारा 

Updated: Jun 17, 2020, 04:02 PM IST
'ते शत्रूचा खात्मा करता करता शहीद झाले; हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही' title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये गलवान खोऱ्यात Galwan Valley हिंसक झडप झाल्यानंतर इथं भारतात बऱ्याच हालचालींना वेग आले. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, सैन्यदल प्रमुखांच्या बैठका झाल्या. ज्यानंतर आता खुद्द Prime Minister Narendra Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढं येत गलवान खऱ्यातील घटनेवर आपली ठाम भूमिका मांडत चीनला इशारा दिला आहे. 

'भारत एक शांतताप्रिय देश आहे आणि या देशाला शांतता हवी आहे. पण, डिवचल्यास कोणत्या परिस्थिती यथोचित उत्तर देण्यास सक्षम आहे. आपल्या शहीद वीर जवानांचा देशाला सार्थ अभिमान आहे. कारण, ते शत्रूचा खात्मा करता करता वीरगतीस प्राप्त झाले आहे', असं पंतप्रधान म्हणाले. 

लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेली ही झडप तणावाच्या वातचावरणात आणखी भर टाकून गेली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. देशाच्या सेवेत तत्पर असणाऱ्या जवानांनी आपले प्राण पणाला लाव शत्रूशी दोन हात केले. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचा विश्वास यावेळी मोदींनी देशवासियांना दिला.

'देशवासियांना आणि या देशाला मी एक विश्वात देऊ इच्छितो की, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही. आमच्यासाठी देशाची एकात्मता आणि सार्वभौमता अधिक महत्त्वाची आहे', असं म्हणत देश शांतताप्रिय असला तरीही वेळ पडल्यास तोडीस तोड उत्तर देण्यासही सज्ज आहे, असं म्हणत पंतप्रधान कडाडले.