सुशांतसिंग प्रकरण : बिहार पोलिसांना क्वारंटाईन केल्यानं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

Updated: Aug 5, 2020, 03:53 PM IST
सुशांतसिंग प्रकरण : बिहार पोलिसांना क्वारंटाईन केल्यानं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी तपासासाठी मुंबईमध्ये आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला खडसावलं आहे. अधिकाऱ्याला क्वारंटाईन करणं अव्यवहार्य असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. सुशांतच्या प्रकरणी मुंबईत आलेल्या एसपी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केलं आहे. 

सुप्रीम कोर्टात काय घडलं?

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या बिहार सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने समर्थन केलं.

मुंबई पोलिसांचा तपास सुरू असल्यामुळे तपास सीबीआयकडे द्यायला रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी विरोध केला. 

बिहार पोलीस राजकीय दबावापोटी काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला. तसं या प्रकरणात बिहार पोलिसांच्या हस्तक्षेपाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला. 

पुराव्यात छेडछाड केल्याचा सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आरोप केला आहे. 

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांकडून ३ दिवसांमध्ये उत्तर मागितलं आहे. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीमध्ये अजूनपर्यंत काय झालं? हे मुंबई पोलिसांनी सांगावं, असंही सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे. याचसोबत सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांनाही त्यांचा रिपोर्ट द्यायचे आदेश देण्यात आले आहेत. 

सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या अटक रोखण्याबाबत काहीही भाष्यं केलेलं नाही. सोबतच कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी पुढच्या आठवड्यापर्यंत स्थगित केली आहे.