Crime News : धक्कादायक! नवरा-बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव, 2 वर्षापूर्वीच झालं होतं लव्हमॅरेज

Crime News : मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेने सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी यानंतर कारवाई करत महिलेच्या पतीला अटक केली आहे

Updated: Jan 26, 2023, 12:06 PM IST
Crime News : धक्कादायक! नवरा-बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव, 2 वर्षापूर्वीच झालं होतं लव्हमॅरेज title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतचं. प्रत्येक घरात काही ना काही गोष्टींवरुन नवरा बायकोत छोटी मोठी भांडणं होतं असतात. पण कधी कधी या भांडणांचे रुपांतर मोठ्या वादात होतं आणि काही तरी धक्कादायक कृत्य घडतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडलाय. नवरा बायकोच्या भांडणात त्यांच्या चिमुकल्या मुलाला जीव (Crime News) गमवावा लागला आहे. एका महिलेने आपल्या 10 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृतदेह घेऊन रडत रडत पोलीस ठाणे (Uttar Pradesh Police) गाठल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजगंज जिल्ह्यातील परसामलिक पोलीस ठाण्यात एक महिला 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह घेऊन पोहोचल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. पण जेव्हा महिलेने तिची वेदनादायक कहाणी सांगितली तेव्हा तिथे उपस्थित पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

आस्था चौधरी नावाची महिला दहा महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली होती. महिलेने माझ्या नवऱ्याने मुलाला मारुन टाकले असे सांगताच पोलिसांना धक्का बसला. मंगळवारी दोघांमध्ये काही कारणांवरुन भांडण झालं. नवरा-बायकोमधील भांडण इतके वाढले की आस्था चौधरीने आपल्या दहा महिन्यांच्या मुलाला घेऊन मामाकडे जाण्याचा निर्णय घेतला. याचा पती चंद्रशेअर चौधरीला राग आला आणि त्याने संतापाच्या भारात आस्थाच्या हातून मुलाला हिसकावून घेतलं आणि जोरात जमिनीवर आपटलं. जमिनीवर आपटल्याबरोबर ते मूल किंचित रडले आणि मग कायमचेच शांत झाले.

पीडित महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी चंद्रशेखर चौधरीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. चंद्रशेखर चौधरी हा नेपाळचा रहिवासी असून तो वीटभट्टीवर काम करतो. मंगळवारी रात्रीच तो नेपाळहून महाराजगंजला आला होता. त्यानंतर रागाच्या भरात त्याने मुलाची हत्या केली.

चंद्रशेखरला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यावरून पत्नी आणि पतीमध्ये वारंवार वाद होत होते. आस्था तिच्या मुलासह तिथे राहायची आणि घरकाम करुन आपलं पोट भरत होती. मात्र जेव्हाही चंद्रशेखर घरी यायचा तेव्हा दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. चंद्रशेखर अनेकदा दारूच्या नशेत आस्थाला मारहाण करायचा. चंद्रशेखर आणि आस्था दोघेही नेपाळचे रहिवासी आहेत. तिथेच त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. दहा महिन्यांपूर्वी पहिल्या मुलाचा   जन्म झाला. दोघांचा संसार चांगला चालला होता. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले.