UP Election 2022 : ...तर निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातही 'महाविकासआघाडी' पॅटर्न

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाला बहुमत मिळतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण जर कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर सत्तेसाठी कोणते पक्ष एकत्र येऊ शकतात. याची चर्चा आतापासून सुरु झालीये.

Updated: Feb 20, 2022, 03:50 PM IST
UP Election 2022 : ...तर निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातही 'महाविकासआघाडी' पॅटर्न title=

मुंबई : राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि काहीही कायम स्वरुपी नसतं. वेळेनुसार राजकीय पक्ष आपली भूमिका बदलतात. कोण कधी कोणाचा मित्र पक्ष होईल आणि कोण कधी कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाहीत. एकत्र सत्तेत बसलेले आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. हे चित्र महाराष्ट्राने देखील विधानसभा निवडणुकीनंतर पाहिलं आहे. (Maharashtra Pattern in UP election)

देशातील सर्वात मोठ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशसह ५ राज्यात निवडणुका होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची ही सेमीफायनल मानली जात आहे. त्यामुळे देशातील सर्वच महत्त्वाचे पक्ष या निवडणुकीत जोर लावत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. पण जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली किंवा कोणाकडे ही स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा कोणता पक्ष कोणासोबत जाईल याचे तर्क वितर्क आतापासून लावले जात आहेत.

BJP विरोधात महाआघाडी?

समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की, काँग्रेस आणि बसपाने हे निश्चित करावं की त्यांची लढाई भाजप सोबत आहे की सपा सोबत. त्यामुळे गरज पडली तर सपा काँग्रेस आणि बसपा सोबत हातमिळवणी करु शकते. याचे हे संकेत आहेत.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा पॅटर्न देशाने पाहिला आहे. याआधी 2017 मध्ये सपा-काँग्रेस एकत्र लढले होते. तर 2019 मध्ये सपा-बसपा एकत्र आले होते. पण 2022 मध्ये गरज पडल्यास हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात.

प्रियंका गांधीकडून ही संकेत

काँग्रेसच्या यूपीच्या प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील याआधी संकेत दिले आहेत. त्यांनी आपण ओपन माईंडेड असल्याचं म्हटलं होतं. आमचा उद्देश भाजपला हरवण्याचा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सपा आणि काँग्रेसकडून महाआघाडीचा पर्याय उघडा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन राजकारणात काहीही होऊ शकतं हे दाखवून दिलं. अनेक वर्ष ज्यांच्या सोबत राहिले त्या भाजप विरोधात जाऊन शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली. त्याआधी अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे देखील महाराष्ट्रासाठी नवीन होतं. पण नंतर हे सरकार बहुमत सिद्ध करु शकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मग यानंतर राजीनामा दिला.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर देखील असंच काही चित्र तयार होईल का अशी शंका अनेकांच्या मनात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि सपा हे बसपाला देखील सोबत घेऊ शकतात. पण यासाठी तेवढ्या जागा त्यांना जिंकाव्या लागणार आहेत.