बोंड अळीचा आणखी एक बळी, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Updated: Nov 7, 2020, 11:47 AM IST
बोंड अळीचा आणखी एक बळी, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पश्चिम विदर्भात मागील दहा महिन्यात ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील ममदापुर या गावातील देवराव सांभारे या ५३ वर्षीय शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे..

देवराव भाऊरावजी सांभारे यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी यावर्षी दोन एकर सोयाबीन आणि दोन एकर कपाशीची लागवड केली होती. यात खोडकिडा आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले.

त्यामुळे केवळ त्यांना तीन क्विंटल सोयाबिन झाले आणि तेही खराब त्यानंतर आता त्याची भिस्त होती कपाशीवर यात मात्र कपाशीवरही बोंड अळी आल्याने कपाशी पार सडली.

त्यामुळे हाताचे दोन्ही पीक गेल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा लोकांचे पैसे बँकेचे कर्ज कसं फेडायचे  ?अशा विविध संकटाच्या गर्तेत ते अडकून पडले होते. त्याच विवंचनेत त्यांनी घरी येऊन गळफास घेऊन जिवन यात्रा संपवली.

आधी बोगस बियाणे, मग कुठे कमी पाऊस तर कुठे अति पाऊस त्यात कपाशीवर आलेली बोंडअळी तर सोयाबीन वर आलेला खोडकिडी त्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यातुनच मागील दहा महिन्यात पश्चिम विदर्भातील आठशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.