आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर,  विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज....

Updated: Aug 24, 2022, 07:30 PM IST
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा title=
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले स्पेशल चाईल्ड प्रथमेश निलेश बुवा आणि देवेंद्र बुरुंगे

सोनू भिडे, नाशिक :    

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मतिमंद (Mentally) आश्रम शाळेतील चार विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली होती. बुधवारी सकाळी मुलांना त्रास होत झाल्यानं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सकाळी दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू सुरू असून अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

काय होती घटना

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी  शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय आहे. या विद्यालयात इंदिरा भारती कर्ण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थां आहेत. या विद्यालयात १२० विद्यार्थी शिक्षण घेतात.  मंगळवारी रात्री या सर्व मुलांनी खिचडीचे जेवण केले होते. 

बुधवारी (24 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास यातील 4 विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. या चारही विदयार्थ्यांना उपचाराकरिता  इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

इगतपुरी येथे उपचारा दरम्यान हर्षल गणेश भोईर वय 23 वर्ष रा. भिवंडी, जि. ठाणे आणि मोहम्मद जुबेर शेख वय११ वर्ष  रा. नाशिक या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला तर प्रथमेश निलेश बुवा, वय १७ आणि देवेंद्र बुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने दोघांना उपचाराकरिता नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनेची चौकशी प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या खीचडीचे नमुने जमा केले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.