बदलापुरात खळबळ: रात्री नमाजला गेला 9 वर्षांचा मुलगा, सकाळी पोत्यात सापडला! नेमकं काय घडलं?

बदलापुरमध्ये थरारक घटना घडली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. 

Updated: Mar 25, 2024, 07:30 PM IST
बदलापुरात खळबळ: रात्री नमाजला गेला 9 वर्षांचा मुलगा, सकाळी पोत्यात सापडला! नेमकं काय घडलं? title=

Badlapur Crime News : बदलापुरमध्ये थरारक घटना घडली आहे. नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह पोत्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा रात्री नमाज पढून मस्जिदच्या बाहेर आला मात्र, सकाळी त्याचा मृतदेह सापडला. या मुलाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिले. हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. 

बदलापुर जवळील गोरेगावात ही थरारक घटना घडली आहे. नऊ वर्षाच्या मुलाची हत्या झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास मृत मुलगा गावातील मस्जिदमध्ये नमाज पढुन बाहेर पडला. त्यावेळेस गावातीलच एका व्यक्तीने त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्याने त्याच्या वडिलांना फोन करून 23 लाखांची खंडणी मागितली. मात्र, त्यानंतर अपहरणकर्त्याचा फोन बंद झाला.दरम्यान गावकऱ्यांनी रात्रभर मुलाचा शोध घेतला. बदलापूर ग्रामीण पोलिस आणि क्राइम ब्रांचने  घटनास्थळी येऊन तपास केला. त्यानंतर गावात राहणाऱ्या अपहरणकर्त्याच्या घरातच या मुलाचा गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह मुंबईच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ऐन सणाच्या तोंडावर ही हत्या झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

नाशिकच्या पंचवटीमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या

नाशिकच्या पंचवटी भागात एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आलीय. सहा जणांनी किरकोळ वादातून धारदार शस्त्रानं वार करत ही हत्या केली. चार आरोपी अल्पवयीन आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पत्नीसह 2 मुलींना पेट्रोल टाकून जिवंत जाळले

अहमदनगर जिल्हा तिहेरी हत्येनं हादरलाय. पत्नीसह 2 मुलींना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना पिंपळगाव लांडगा इथे घडलीय. पत्नी लीलाबाई लांडगे, मुलगी साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर पती सुनील लांडगेला नगर तालुका पोलिसांनी अटक केली. मात्र, या हत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पत्नीसह दोन निष्पाप मुलींना जिवंत जाळल्यानं नगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथिल युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रंगपंचमीच्या दिवशी धुळवड साजरी करून दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात दोनाड येथे आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नितेश तेजराम बर्डे (25) युवकांचा नाव आहे. तर, या घटनेने कुडेगावात शोककळा पसरली आहे.