ओबीसी आरक्षणाच्या रद्द जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

5 जिल्हा परिषदा, 37 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका

Updated: Jun 22, 2021, 09:16 PM IST
ओबीसी आरक्षणाच्या रद्द जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर title=

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या रद्द झालेल्या जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक वादात अडकलीये. राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकांची घोषणा केलीय. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि 37 पंचायत समित्यांमधील (By-elections of 5 Zilla Parishad, 37 Panchayat Samiti in Maharashtra) रिक्त जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक होईल. त्यासाठी 19 जुलैला मतदान आणि 20ला मतमोजणी होईल. 

राज्य सरकार लिहिणार निवडणूक आयोगाला पत्र
निवडणूक रद्द करण्याबाबत राज्य सरकार निवडणूक आगोयाला पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती तसंच पावसाळा असल्यानं आता निवडणुका घेता येणार नसल्याचं सरकारचं मत आहे. शिवाय राज्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवल्याशिवाय निवडणुका घेता येणार नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

ओबीसी नेते आक्रमक
ओबीसी आरक्षणाचा वाद मिटेपर्यंत निवडणुका होऊ नयेत, असा पवित्रा सर्वच पक्षांमधल्या ओबीसी नेत्यांनी घेतलाय. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला होता. तर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार घेऊ नयेत अशी भूमिका घेतली होती. पण आता निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने ओबीसी नेते काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. 

इतक्या जागांसाठी होणार मतदान
धुळ्यात 15, नंदूरबारमध्ये 11,अकोल्यात 14, वाशिममध्ये 14 आणि नागपूरमध्ये 16 जिल्हापरिषद विभागात निवडणुका होणार आहेत. तर, धुळ्यात 30, नंदूरबारमध्ये 14, अकोल्यात 28, वाशिममध्ये 27 आणि नागपूरमध्ये 31 पंचायत समिती निर्वाचक गणामध्ये निवडणुका होणार आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीसाठी 29 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलैला होईल.  अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलैला तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 19 जुलैला रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल, आणि 20 जुलैला होणार आहे.