चिखल महोत्सव : मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा उत्सव

कोकणातील आगळा वेगळा चिखल महोत्सव.आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा महोत्सव.

विकास गावकर | Updated: Jul 16, 2018, 01:24 PM IST
चिखल महोत्सव : मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा उत्सव title=

सिंधुदुर्ग : आपण आजवर खाद्य महोत्सव पाहिला असेल, नाट्य महोत्सव पहिला असेल जास्तीत जास्त काय चित्रपट महोत्सव पहिला असेल पण आपण कधी 'चिखल महोत्सव' पाहिला आहेत का ? नाही ना मग आज आम्ही तुम्हाला असाच एक चिखल महोत्सवाची  झळक दाखवणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावात चक्क चिखल महोत्सव भरला होता. आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा असा हा महोत्सव. कोकणातील आगळा वेगळा चिखल महोत्सवाची ओळख पाहू या.

 मड फेस्टिव्हलचे आयोजन 

सिंधुदुग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गाव. इथे अनेकजण चक्क  मातीत रममाण झालीत. मोठी माणसही चक्क मातीत खेळताहेत. निमित्त आहे चिखल महोत्सवाचं. धक्काधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्त्वच विसरत चाललो आहोत. नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी यथेच्छ खेळणारे आपण,  मोठेपणी मात्र, यापासून दूर राहतो. याच मातीची महती विषद करणारा , मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेय.

आनंदच नव्हे तर मायेची उब

बळीराजाला प्रिय असणाऱ्या मातीचे प्रेम सर्वांमध्ये जागृत करणारा, मातीचे महत्व अधोरेखित करणारा चिखल महोत्सव पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गमधील हरकुळ खुर्द गावात भरवण्यात आला होता. आगळ्यावेगळ्या असणाऱ्या या महोत्सवासाठी मुंबई ,पुण्यासह अनेक भागातून आलेले विद्यार्थी, पर्यटक, गृहिणी आणि अबाल-वृद्ध यांनी यात सहभागी होत मातीबद्दल प्रेम दाखवून दिले. कोकणात सध्या मस्त पाऊस लागतोय या पावसात हा झालेला आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची उब देऊन गेला.

स्थानिक देवतेला गाऱ्हाणे

 या महोत्सवाची सुरुवात कोकणची परंपरा असणाऱ्या स्थानिक देवतेला गाऱ्हाणे घालून करण्यात आली. मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आले. आणि मग सुरु झाला एकच जल्लोष. मातीमध्ये खेळण्याचा , लोळण्याचा, मातीचे लेपन करण्याचा.  याच मातीत बळीराजा कष्ट करुन अन्न पिकवतो. या कष्टाची जाण सर्वसामान्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शेतीकामाचा अनुभव सहभागी झालेल्यांना देण्यात आला. चिखल केलेल्या वाफ्यांमध्ये जमीन सपाट करून भाताच्या रोपांची लावणी करण्यात आली. 

बांधावरच्या  न्याहारीचा आस्वाद

शेतकऱ्यांसारखाच बांधावरच्या  न्याहारीचा आस्वाद घेतला. अस्सल मालवणी गोलमा भाकरी, चण्याची आमटी ,भाताची पेज हे न्याहारीमध्ये होते.  अस्सल मालवणी सागोती वडे , मासे याचे जेवण सहभागीना देण्यात आले. भरपूर पाऊस , मातीमधील खेळणे, शेतीचा अनुभव आणि मालवणी जेवण याने केवळ सर्वजण केवळ सुखावूनच गेले नाही तर मातीप्रेमाने पुन्हा एकदा समृद्ध झाले.