नक्षलवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईकची शहिदांच्या कुटुंबियांची मागणी

नक्षलवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी

Updated: May 2, 2019, 07:11 PM IST
नक्षलवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईकची शहिदांच्या कुटुंबियांची मागणी title=

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठा धक्का बसलाय. शिरजोर झालेल्या नक्षलवाद्यांना ठेचून काढण्यासाठी आता सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी होत आहे. गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात १५ पोलीस शहीद झाले. १९८० पासून गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये २२४ पोलिसांना वीरमरण आलं. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं जसं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला. तसाच सर्जिकल स्ट्राईक नक्षलवाद्यांविरोधात करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रं आली आहेत. नक्षलवादी इन्सान्स, एके-४७ सारख्या स्वयंचलित रायफल्सचा वापर करतात. नक्षलवाद्यांनी आयईडी मार्फत स्फोटाचं तंज्ञही हस्तगत केलं आहे. नक्षलवादाचा हा राक्षस ठेचून काढण्याची हिच वेळ आहे. पोलीस महासंचालकांनीही पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली आहे.

अत्याधुनिक शस्त्र आणि लढण्याच्या तंत्राच्या जोरावर नक्षली पोलीस आणि प्रशासनावर वरचढ होऊ पाहत आहेत. भारतीय लोकशाहीला कँन्सरप्रमाणं पोखरणाऱ्या या नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची आता वेळ आली आहे.