प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, प्रियकर म्हणाला 'तू माझी नाहीस तर कुणाचीच नाहीस'

प्रेयसीचं दुसरं लग्न ठरल्याने संतापलेला प्रियकर तिला शेवटचं भेटायला गेला... डोंबिवलीतल्या घटनेनं खळबळ

Updated: May 31, 2022, 06:59 PM IST
प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, प्रियकर म्हणाला 'तू माझी नाहीस तर कुणाचीच नाहीस' title=
प्रतिकात्मक फोटो

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली :  प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करत असल्याच्या रागातून प्रियकराने धक्कादायक कृत्य केलं. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

नेमकी घटना काय?
नाशिक मधील वडनेर भैरव इथं राहणाऱ्या अनिल साळुंखे याचं डोंबिवलीत निळजे कासारियो गोल्ड सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणीबरोबर प्रेम संबध होते. मात्र अनिल हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्याने कुटुंबीयानी तिचं दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवलं.

काही दिवसापूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याची माहिती अनिलला मिळाली. संतापलेल्या अनिलने 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास भेटण्याच्या बहाण्याने त्या तरुणीच्या घरी गुपचूप प्रवेश केला. मला शेवटचं तुझ्याशी बोलायचं आहे असं त्याने तिला सांगितलं. 

पण घरात गेल्यावर अनिलने रागाच्या भरात प्रियसीचा नायलॉन दोरीने गळा आवळला, एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने तिचं नाक तोंड दाबलं. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर त्याच नायलॉनच्या रस्सीने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. 

सकाळी 11 वाजन्याच्या सुमारास हाका मारूनही मुलगी दरवाजा उघडत नसल्याने तिच्या बहिनेने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. 
 
डोंबिवली पूर्व निळजे कासारिया गोल्ड या हायप्रोफाइल सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.