'कुणाचंही सरकार आणा, पण भाजपचं येऊ नये'

कुणाचंही सरकार आणा, पण भाजपचं येऊ नये, अशी इच्छा शेतकरी नेते राजू

Updated: Nov 18, 2019, 06:11 PM IST
'कुणाचंही सरकार आणा, पण भाजपचं येऊ नये' title=

पुणे : कुणाचंही सरकार आणा, पण भाजपचं येऊ नये, अशी इच्छा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पुण्यात बोलून दाखवली. पण ज्याचं सरकार येईल, त्यांनी आमचा सातबारा कोरा करावा, असं आवाहनही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. 'मी पुन्हा येईन' म्हणणारे देवेंद्र फडणवीस बहुदा नागपूरला जातील, असा टोला लगावत भाजपला वगळून इतर तीन पक्षांनी सत्ता निर्माण करावी अशी सर्व सामान्यांची भावना असल्याचंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 

राजू शेट्टी हे मागील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत केंद्रात गेले होते, मात्र यानंतर काही दिवसांनी राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या मुद्यावर भाजपासून दूर गेले होते. त्यांचे जवळचे साथीदार सदाभाऊ खोत हे देखील त्यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी देखील वेगळी चूल मांडली होती. यानंतर राजू शेट्टी यांचा तेव्हापासून भाजपविरोधी सूर दिसून येतो, तो आजही कायम आहे.