कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक वेळेत होण्याचे संकेत

केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता 

Updated: Jun 22, 2020, 08:50 PM IST
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक वेळेत होण्याचे संकेत  title=

आतिष भोईर, कल्याण : एकीकडे कोरोनामुळे अनेक महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केडीएमसीला पत्र पाठवून प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे केडीएमसीची निवडणूक ठरल्या वेळप्रमाणे होते का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनापाठोपाठ आलेलं लॉकडाऊन 3 आठवड्याभरापूर्वी शिथिल केले गेले. राज्य शासनाने अनलॉक १ च्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध अटी शर्तीचे पालन करून शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गतच राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस यांनी महापालिकेला पत्र पाठविले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० ला संपत आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा कार्यक्रम हा एप्रिल अथवा मे २०२० या कालावधीत होणे आवश्यक होते. 

डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. मात्र अजूनही त्यासंदर्भात कोणतीही अधिसुचना पालिकेला प्राप्त झालेली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी असल्याने 18 गावांच्या नगरपरिषदेच्या सरकारी निर्णयाला त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे १८ गावांचे काय होणार ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना आता सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची वाढ वेगाने होत आहे. त्यातच निवडणूक घेण्याचे मोठं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.