पतीच्या अंत्यसंस्काराच्या तेराव्या दिवशी हवाईदलाची परीक्षा देणाऱ्या वीरपत्नीला सलाम

या परिस्थितीत त्या डगमगल्या नाहीत.

Updated: Mar 10, 2020, 04:21 PM IST
पतीच्या अंत्यसंस्काराच्या तेराव्या दिवशी हवाईदलाची परीक्षा देणाऱ्या वीरपत्नीला सलाम  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : हवाई दलाच्या सेवेत पती शहीद झालेला असताना खडतर प्रशिक्षण घेत वीरपत्नी पुन्हा हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर होणार अशी घटना फार दुर्मिळ, तरीही तितकीच प्रेरणादायी. पुलावामा हल्ल्यांनातर सर्जिकल अटॅक करताना झालेल्या नाशिक मधल्या शहीद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबाबाबत मात्र हे सत्य वास्तवात उतरलं आहे. अगदी विपरीत परिस्थितीत एका वीर पत्नीने शहीद पतीच्या शौर्याला दिलेली ही सलामीच.    

नाशिक शहरातील डीजीपीनगर परिसरात नगरपरिषद राहणाऱ्या निनाद मांडवगणे यांचा मागील वर्षी २७ फेब्रुवारीला एमआय 17 v5 या हेलिकॉप्टरमध्ये अपघात झाला यात, निनाद यांच्यासह दहाजण शहीद झाले. निनाद यांच्या त्यांची पत्नी विजेता आणि मुलगी यांचं छत्र हरपलं. पण, या परिस्थितीत त्यांची पत्नी विजेता डगमगल्या नाहीत. 

देशसेवेत रुजू होण्याचा निर्णय तिने घेतला. पतीच्या अंत्यसंस्काराच्या तेराव्या दिवशी अहमदाबाद येथे त्यांनी हवाईदलाची परीक्षा दिली.  परीक्षा दिल्यानंतर आपलं वजन आणि देहयष्टी या पदासाठी सुडौल आणि कणखर बनवत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मुलीची जबाबदारी आजी- आजोबांवर सोपवत त्यांनी ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. सध्या त्या हैदराबादमध्ये खडतर प्रशिक्षण घेत जून महिन्यात अधिकृतपणे त्या हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून रुजू होणार आहे. 

विजेता यांच्याप्रमाणेच आणखी एक उदाहरण म्हणजे, गौरी प्रसाद महाडिक यांचं. २०१७मध्ये शहिद झालेल्या सैन्यदलातील मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी सध्या सैन्यदलात मोठ्या हुद्द्यावर नियुक्त झाल्या आहेत. सर्व्हिस सिलेक्शनची मुलाखत फेरी पार करत त्यांनी गुणतालिकेतही वरचं स्थान मिळवलं होतं. हल्लीच त्यांनी चेन्नीत असणाऱ्या ओटीए अर्थात ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणही पूर्ण केलं. जवळपास ४९ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर अखेर आज त्या आपल्या पतीप्रमाणेच देशसेवेचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांच्या स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने प्रवास करत आहेत.

...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

दोन विविध घटनांमध्ये या वीरपत्नींनी आपल्या पतीला गमावलं. पण, याविषयीचं दु:ख फार काळासाठी कवटाळून न पाहता त्यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीचा स्वीकार केला. फक्त परिस्थितीचा स्वीकारच नव्हे, तर स्वत:ची नवी ओळख तयार करण्यासाठी आणि पतीची ओळख जपण्यासाठी या दोघींनीही देशसेवेचीच वाट निवडली.