अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर सत्ता मिळाली असती?: महाजन

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावर आघाडी सरकारवर टीका केलीय.

Updated: Jul 30, 2018, 12:13 PM IST
अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर सत्ता मिळाली असती?: महाजन title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव: अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर आम्हाला राज्यात सत्ता मिळाली असती का?, असा सवाल करत गिरीश महाजन यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. जळगावात पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावरून आघाडी सरकारवर टीका केलीय. भाजप सरकारनं अडीच हजार सिंचनाच्या निविदा काढल्या पण त्यातल्या ९२% निविदा ह्या बिलो रेटने दिल्या. आघाडी सरकारच्या काळात मात्र ५०% अबोव्ह रेटने निविदा दिल्या गेल्यानं नेते ठेकेदार गब्बर झाले. शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित राहिले असंही महाजन म्हणाले.

ठेकेदार गब्बर झाले शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावर आघाडी सरकारवर टीका केलीय. भाजप सरकारने अडीच हजार सिंचनाच्या निविदा काढल्या परंतु त्यातील ९२% निविदा ह्या बिलोरेटने दिल्या गेल्या. आघाडी सरकारच्या काळात मात्र ५०% अबोव्ह रेटने निविदा दिल्या गेल्यानं नेते ठेकेदार गब्बर झाले. शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित राहिले असंही महाजन म्हणाले. महापालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपत असताना भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलंय. 

शिवसेना वाघ असल्याचा आव आणते

दरम्यान, महापालिका निवडणुकीचा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आला असून, आरोप प्रत्यारोपांना जोर चढलाय. शिवसेना नुसताच वाघ असल्याचा आव आणतेय, मात्र विधानसभेसह राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची काय परिस्थिती आहे, असा सवाल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. जळगाव महापालिकेसाठी बुधवारी मतदान पार पडत आहे. गिरीश महाजन यांची जळगावातल्या सुभाष चौकात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शेलक्या भाषेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. या निवडणुकीत शिवसेना भाजप आमनेसामने आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीत काही जागा अपवाद वगळता मैत्रीपूर्ण लढती होतायत.