'उद्या राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू'

आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.  

Updated: Aug 24, 2020, 12:39 PM IST
'उद्या राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू' title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: काँग्रेसच्या नेतृत्त्वावरून सुरु असलेल्या राजकीय घुसळणीमुळे आता महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी: मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी

मात्र, त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातील पत्रकारपरिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाऊ नये, अशी राहुल गांधी यांची इच्छा होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यास काँग्रेसची भूमिका काय असेल, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. त्यावर वडेट्टीवार यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकासआघाडी मध्ये सहभागी झाला होता. उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की सरकार मधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

'गांधी हे केवळ कुटुंब नव्हे तर भारताचा 'डीएनए' आहे'

याशिवाय, काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी स्वपक्षीयांवर केलेल्या टीकेसंदर्भातही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. काँग्रेस म्हणजे काही भाजप नाही, दोन हुकूमशाह सर्व करतायेत अशी स्थिती आमच्याकडे नाही. तरीही मला वाटते गांधी परिवाराकडे नेतृत्व असावे. त्यांच्यातच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.