जिल्हा वार्षिक निधीत विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळला,

भाजपनेच अनेक जिल्ह्यांना निधी कमी दिल्याचा अजित पवारांचा आरोप

Updated: Mar 13, 2020, 12:36 PM IST
जिल्हा वार्षिक निधीत विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळला, title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  जिल्हा वार्षिक निधीत वाटपात महाविकास आघाडीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भावर अन्याय केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना आकडेवारीसह हे आरोप फेटाळले. मागील सरकारनेच इतर जिल्ह्यांना सूत्रानुसार निधी न देता तो काही जिल्ह्यांकडे वळवल्याचा आरोप अजित पवारांनी केला. 

 जिल्हा वार्षिक निधीचे वाटप जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, मानव विकास निर्देशांक यानुसार ठरते. मागच्या भाजप सरकारने अनेक जिल्ह्यांना सूत्रानुसार जेवढा निधी द्यायला हवा होता, तेवढा दिला नाही. अनेक जिल्ह्यातील निधी काढून तो इतरत्र वळवला. आम्ही मात्र सूत्रानुसार जेवढा निधी द्यायला हवा होता, त्यापेक्षा एकाही जिल्ह्याला कमी निधी दिला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी विधानसभेत केला. आम्ही कुणाच्या तोंडाचा घास काढून घेतला नाही. नागपूरला यावर्षी सूत्रानुसार 288 कोटी रुपये द्यायच्या ऐवजी आम्ही 525 कोटी रुपये दिल्याची माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली. निधीच्या सूत्रानुसार भाजप सरकारच्या काळात २०१९-२० चे वाटप कसं झालं होतं याचे आकडे अजित पवारांनी विधानसभेत दिले.

अजित पवारांच्या भाषणासाठी ठळक मुद्दे 

- भाजप सरकारने मुंबईला 125 कोटी रुपयांऐवजी 124 कोटी रुपये दिले
- मुंबई उपनगरला 380 कोटी ऐवजी 329 कोटी दिले, म्हणजेच 51 कोटी नियमापेक्षा कमी दिले
- ठाणे जिल्ह्याला 63 कोटी रुपये कमी दिले
- आदिवासी जिल्हा असलेल्या पालघरचे 20 कोटी कमी केले
- रायगड १४ कोटी कमी केले
- पुण्याचे 98 कोटी कमी केले
- सांगलीचे - 43 कोटी कमी केले
- सोलापूरचे कमी केले
- कोलापूर 51 कोटी कमी केले
- भाजप सरकारने पुणे विभागात ३१० कोटी सूत्रापेक्षा कमी दिले
- नाशिक विभागाचे 196 कोटी रुपये हक्काचे कमी दिले
- औरंगाबाद विभागात 91 कोटी कमी दिले
- मात्र नागपूरला 288 कोटी रुपये नियमानुसार द्यायच्याऐवजी 525 कोटी रुपये दिले
- वर्ध्याला 58 वाढवून दिले
- अर्थमंत्री सुधीर मुनगुंटवार यांच्या चंद्रपूरला 160 कोटी वाढवून दिले
- गडचिरोली 107 कोटी वाढवून दिले नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने ठिक आहे 
- मात्र अमरावती विभागाला 18 कोटी कमी दिले, हे बरोबर नाही
दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून तुम्ही निधी वाटप केलं, आम्ही तसं केलं नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.
आम्ही यावर्षी पैसे देताना सूत्रानुसार नागपूरला 288 कोटी द्यायला हवे होते, ते आम्ही 400 कोटी रुपये दिले. 
- वर्ध्याला सूत्रापेक्षा 21 कोटी वाढवून दिले
- चंद्रपूरलाही वाढवून दिले
- भंडाऱ्यालाही वाढवून दिले
आम्ही कुणाचा घास काढूून दिले नाही, असं अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना सांगितले.