निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट

काय म्हणाले उदयनराजे? 

Updated: Oct 25, 2019, 09:58 AM IST
निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट  title=

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला. उदयनराजेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडून आले आहेत. उदयनराजे भोसले 88 हजार 493 मतांनी हरले आहेत. भाजपला हा सर्वात मोठा धक्का असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले. यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

छत्रपती उदयनराजे भोसलेंची भावनिक पोस्ट 

आज हरलो आहे पण थांबलो नाही, 
जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही.

लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार.
सदैव आपल्या सेवेशी तत्पर, अशी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी ट्विटरवर शेअर केली आहे. 

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा पराभवाचा धक्का बसला. त्यांचा मोठा दारुण पराभव झाला. उदयनराजे भोसले यांना ३ लाख ६६ हजार १६६ मते मिळालीत तर श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ५४ हजार ६५९ मते पडलीत. श्रीनिवास पाटील यांनी ८८ हजार ४९३ मतांची निर्णायक आघाडी घेतली आणि विजय पटकावला. लोकसभा निवडणूक जिंकले असताना खासदार झाल्यावर उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे जनतेला फार काही रुचलं नसल्याचं विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालं आहे. 

भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. विधानसभा निवडणुकीबरोबर ही पोटनिवडणूक झाली. मात्र, त्याधी निवडणूक प्रचाराची रणधुमाळीत जोरदार रंगत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी प्रचार सभा घेतली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन सभा झाल्या. शेवटची सभा भरपावसात झाल्याने याची जोरदार चर्चा झाली. मोदींच्या सभेपेक्षा पवारांच्या सभेची जादू साताऱ्यात चालल्याचे दिसून येत आहे.