फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'

Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 9, 2024, 10:56 AM IST
फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'
पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील?

Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय मंत्री अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत, असा संदर्भ देत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीचं पुढील वाटचाल कशी असेल यासंदर्भातील दावाही राऊतांनी केला आहे.

Add Zee News as a Preferred Source

फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत म्हणाले...

"महाराष्ट्रातील जनतेची एकच भावना आहे. आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे," असं विधान अमित शाह यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जाहीर सभेत केलं. यावरुनच फडणवीस पुढील मुख्यमंत्री असल्याचे संकेत शाहांनी दिलेत, असं म्हणत पत्रकरांनी राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "हा आमचा प्रश्न नाही मोदी आता म्हणत आहेत. मी हे तीन महिन्यांपासून सांगत आहे. कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. एकनाथ शिंदे यांचं अवतारकार्य भाजपा संपवणार आहेत ते संपवायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ फडणवीस होतील का? तर तसंही नाही. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल," असा विश्वास व्यक्त केला.

नक्की वाचा >> 'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'

मोदी आल्यावर महाराष्ट्राला अनसेफ वाटतं कारण...

"एक है तो सेफ है म्हणणारे मोदी महाराष्ट्रात आल्यानेच लोकांना अनसेफ वाटू लागतं. महाराष्ट्रातील लोकांनी बटेंगे तो कटेंगे फेकून दिल्याने पंतप्रधानांना ही भाषा वापरावी लागत आहे. तुम्ही महाराष्ट्रात आला तर लोकांना भडकवणार. दंगलींसाठी प्रोत्साहन देणार. जोपर्यंत तुम्ही इथे येणार तोपर्यंत इथे अनसेफ आहे. म्हणून तुम्हाला आम्ही बाहेर फेकणार आहे," असं राऊत यांनी मोदींच्या भाषणावरुन टोला लगावताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील निवडणुकीचं ट्रम्प कनेक्शन! ठाकरेंची शिवसेना म्हणते, ' मोदींनी शिंदेंसारखे...'

मोदींनी महाराष्ट्राची घाण करुन ठेवली

मोदींनी त्यांच्या भाषणात काँग्रेसने दहशतवाद्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राऊतांनी, "मोदींच्या बोलण्याला काही आगापिच्छा नसतो. त्यांनी प्रधानमंत्री म्हणून बोलावं. दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचं काम भाजपा आणि शिंदेंचं सरकार करत आहे. सर्व गुंड त्यांनी गोळा करुन विधानसभा क्षेत्रात मदत घेतली जात आहे. मोदींनी महाराष्ट्राची घाण करुन ठेवली आहे," अशी टीका केली. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More