Maharashtra Monsoon Assembly Session : विधिमंडळ परिसरात मोठा राडा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गेले धावून!

Maharashtra Monsoon Assembly Session : आताची मोठी राजकीय बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला.  

Updated: Aug 24, 2022, 12:41 PM IST
Maharashtra Monsoon Assembly Session : विधिमंडळ परिसरात मोठा राडा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गेले धावून! title=

मुंबई : Maharashtra Political News : आताची मोठी राजकीय बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. यावेळी कोरोनाकाळात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडलेत.

पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Assembly Session) पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा होताना दिसला. आज बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोविड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकासा आघाडीचे आमदारही त्याठिकाणी आले. त्यांच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आघाडीच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. 'गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा', अशी घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी सुरु असताना राडा झाला आणि एकदम तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यामुळे राजकीय दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडल्यानंतर सत्ताधारीही आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

याचाच एक भाग म्हणून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरु होते. भाजप-शिंदे गटाची शरद पवार, उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी सुरु होती. बॅनर्स हातात घेऊन विरोधकांवर टीकास्त्र करत होते. 'बीएमसीचे खोके...मातोश्री ओके' तसेच लवासाचे खोके...बारामती ओके सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजीनंतर जोरदार राडा पाहायला मिळाला.

दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. त्यामुळ विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्ती करत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.