'तिन्हीसांजेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दारात पाणी भरायला'

 जयंत पाटील यांनी दिलीप सोपल यांच्यावर केली आहे. 

Updated: Aug 28, 2019, 08:30 PM IST
'तिन्हीसांजेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दारात पाणी भरायला' title=

सांगली : उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दारात पाणी भरायला गेलात, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीप सोपल यांच्यावर केली आहे. दिलीप सोपल यांच्या शिवसेनाप्रवेशावर जयंत पाटील यांनी माळशिरस येथील जाहीर सभेत समाचार घेतला. 

विधानसभेमध्ये सोपल यांनी कायम शिवसेनेवरच टीका केली आणि आज ते त्यांच्या दारीच बंधन बांधायला गेले असंही पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षावर आत्मविश्वास असता तर महाजनादेश यात्रा काढावी लागली नसती, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या चित्ते पिंपळ या गावी जाऊन दिलीप सोपल यांनी राजीनामा दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. त्यानंतर राजीनामा देऊन थेट संध्याकाळच्या विमानाने मुंबई गाठली. काल त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.