नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने, वाद नेमका काय?

Ganesh Naik Vs Manda Mhatre:  नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 2, 2024, 07:08 PM IST
नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने, वाद नेमका काय? title=
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने

Ganesh Naik Vs Manda Mhatre: नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने आलेत. यावेळेस नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. या दोघांमधील राजकीय संघर्ष या ना त्या कारणाने नेहमीच उफाळून येताना पाहायला मिळतोय.म्हात्रे-नाईकांमध्ये नवीमुंबईमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरून वाद आहेत? जाणून घेऊया. 

गणेश नाईकांच्या सरकारसमोर अटी 

नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्यावरून आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय.नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्याला गणेश नाईक यांनी विरोध केलाय..ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करायची असतील तर गणेश नाईक यांनी सरकारसमोर काही अटी ठेवलेल्या आहेत. त्या अटींच्या पूर्ततेनंतर या गावांच्या समावेशाला आपला विरोध नसल्याचंही गणेश नाईक यांनी म्हटलंय. याबाबतचा पत्र गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय.

आमदार मंदा म्हात्रेही आक्रमक 

तर दुसरीकडे बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे या 14 गावांच्या समावेशासंदर्भात सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय.. गणेश नाईक यांच्या या भूमिकेवरून म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर जोरदार निशाणा साधलाय. 

विधानसभेच्याआधी राजकीय वातावरण तापलं

14 गावांचा नवी मुंबई मनपामध्ये समावेश करण्यावरून दोघांमध्ये संघर्ष आहे. संदीप नाईक बेलापूर मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.
बेलापूर सेक्टर 15 मधील मंदा म्हात्रे यांनी मागितलेल्या भूखंडाला नाईक यांचा विरोध आहे. तसेच दिवाळे गावातील जेट्टीच्या उद्घाटनावरून दोघांमध्ये खडाजंगी उडालेली आहे. आता 14 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा नाईक आणि म्हात्रे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर नवीमुंबईमधलं राजकीय वातावरण तापलंय.