तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषींना मृत्यूदंडाची मागणी, आज निकाल

तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन दोषींच्या शिक्षेबाबतचा आज जिल्हा सत्र न्यायालयात निकाल

Updated: Feb 4, 2020, 10:12 AM IST
तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषींना मृत्यूदंडाची मागणी, आज निकाल title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील हिवरे गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन दोषींच्या शिक्षेबाबतचा निकाल आज जिल्हा सत्र न्यायालयात दिला जाणार आहे. हिवरे गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम यांना मृत्युदंड देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. 

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगलीच्या सत्र न्यायालयात ही मागणी केली आहे. 2015 साली हिवरे गावातील एकाच कुटुंबातील तीन महिलांचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. आई मुलगी आणि सून असं तिघींच्या धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. 

त्यातील एक आरोपी अल्पवयीन होता. उरलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरलेला दोन आरोपींच्या शिक्षेबाबत चा निकाल आज न्यायालयात दिला जाणार आहे.

सुधीर घोरपडे यांची बहीण विद्याराणीचे हिवरे येथील शिंदे कुटुंबात लग्न झाले होते. लग्नानंतर सासरची लोक विद्याराणी हिला त्रास देत असल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप होता. दरम्यान विद्याराणी हिने आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी विद्याराणीचा खून केल्याची फिर्याद माहेरच्या लोकांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती. 

मात्र या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते. शिंदे कुटुंब निर्दोष सुटल्यामुळे सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबावर चिडून होता. आणि त्याने आपल्या मित्रांच्या सहाय्याने हे तिहेरी हत्याकांड घडवलं.

सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात 21 जून 2015 रोजी तिहेरी हत्याकांड झाल होत. एकाच कुटुंबातील तीन महिलांवर तीन हल्लेखोरांनी धारधार शत्राने हल्ला केला होता. या हल्या मध्ये प्रभावती शिंदे आणि सुनीता पाटील या मायलेक जागीच ठार झाल्या होत्या. तर सून निशा शिंदे ही गंभीर जखमी झाली होती.

उपचार दरम्यान जखमी निशा शिंदेचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणी सुधीर घोरपडे, रवींद्र कदम आणि एक अल्पवयीन आरोपी असे तीन अरोपींना अटक केली होती.