मेल्यावर तरी मढ्याला...शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर

मृत्यूनंतरही शेतकऱ्यांच्या नशीबी हालअपेष्टा, मृतदेह पिकअपमध्ये ठेवले आणि...

Updated: Dec 15, 2022, 07:07 PM IST
मेल्यावर तरी मढ्याला...शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर title=

Bhor News : पुणे जिल्ह्यातील भोर (Pune, Bhor) तालुक्यामधील निगडे (Nigade) गावामधील चार शेतकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू (Farmer Death) झाला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने मोटर आणखी पुढे ढकलण्यासाठी गेलेल्या चौघांवर काळाने घाला घातला आहे. इतकंच नाहीतर मृतांमध्ये बाप-लेकांचाही समावेश आहे. अशातच त्यांच्या मृतदेहांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महावितरणाच्या (Mahavitarna) भोंगळ कारभारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाहीतर मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले त्यानंतर शवविच्छेदनासाठी (Postmartam) नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. जवळपास दोन तास तसेच मृतदेह होते कारण रूग्णवाहिका मिळाली नाही. शेवटी एक रूग्णवाहिका (Ambulance) आली पण त्यातून एकच मृतदेह नेण्यात आला. 

तिघांचे मृतदेह अजूनही तसेच पडून होते, स्वत: आमदार संग्राम थोपटेही तिथे होते मात्र सर्व हतबल होते. गावकऱ्यांनी शेवटी गावातील पिकअपमध्ये तिन्ही मृतदेह घेतले आणि भोरमधील सरकारी दवाखान्यात नेले. ग्रामस्थांमध्ये तणावाचं वातावरण झालं होतं. गावातील चार जणांचा एकाच वेळी असा दुर्दैवी झाला. शेवटालाही त्यांच्या मृतदेहाची अशी हेळसांड.... 

शेतकरी जिवंत असताना पोटाला चिमटा काढून चटणी-भाकरीही आनंदाने खात असतो. त्याची काही तक्रार नसते, निसर्गही त्याला हवं तसं काही देत नाही. अनेकवेळा कमी पाऊस झाला किंवा पाऊस जास्त झाला म्हणूनही हातातोंडाशी आलेलं पीक जातं. अतिवृष्टी झाल्यावर नुकसान भरपाईची मदत वेळेवर येत नाही. किमान मायबाप सरकारने त्याला जिवंत असताना नाहीतर मेल्यावर तरी त्याच्या मढ्याला एक रूग्णवाहिका तरी उपलब्ध करून द्यावी,  अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. 

नदीला जोडूनच एक बंधारा असून त्याच्या प्लेट्स पाटबंधारा विभागाने आता पाऊस गेला तरी लावल्या नाहीत. या प्लेट्स नसल्यामुळे पाणीसाठा झाला नाही, याचा परिणाम असा झाला की आता पाऊस नसल्याने पाणीसाठी कमी झाला आणि मोटर उघड्या पडल्या. मोटर पाण्यात ढकलण्यासाठी गेलेल्या चौघांना आपला जीव गमवावा लागला, असं सांगत पाटबंधारे विभागावरही निगडे गावच्या ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. 

 मृतांमध्ये आनंदा ज्ञानोबा जाधव वय 55 (Ananda Gyanoba Jadhav) अमोल चंद्रकांत मालुसरे (Amol Chandrakant Malusare) वय 32, विठ्ठल सुदाम मालुसरे वय 50,सनी विठ्ठल मालुसरे वय 27 सर्व रा. निगडे नदीवर गेले होते. मोटर पाण्यात ढकलत असताना अचानक वीजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.