ठाणेकरांची सकाळ आणि संध्याकाळ वाहतूक कोंडीत, रुग्णांचे हाल

ठाणेकरांची तसेच या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांची सकाळ आणि संध्याकाळ अक्षरश: वाहतूक कोंडीत 

Updated: Nov 19, 2019, 11:30 AM IST
ठाणेकरांची सकाळ आणि संध्याकाळ वाहतूक कोंडीत, रुग्णांचे हाल title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणेकरांची तसेच या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांची सकाळ आणि संध्याकाळ अक्षरश: वाहतूक कोंडीत जाते. घोडबंदर भागातल्या महामार्गाच्या मधोमध बॅरिकेड लावून मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. आधीच घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी असते. आता त्यात मार्गिकेचा एक भाग अडविल्यामुळे कोंडीत आणखी भर पडली आहे. तीनहात नाका भागातून संध्याकाळी परराज्यांत जाणाऱ्या बसगाड्या सुटतात. त्याचा फटका या चौकातल्या वाहतुकीला बसतो. तीनहात नाका ते माजिवाडय़ापर्यंतच्या सेवा रस्त्यांवरही मेट्रोच्या कामामुळे कोंडी होऊ लागली आहे. 

तर कासारवडवली ते वडाळा मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी तीन हात नाक्याच्या दिशेनं जाणाऱ्या उड्डाणपुलाशेजारीच मेट्रोचा खांब उभारण्याचं काम सुरू झाल्यानं कोंडीत भर पडण्याची शक्यताय. त्यासाठी उड्डाणपुलाला लागूनच खोदकाम सुरू करण्यात आलंय. या कामासाठी सहा मीटरचा रस्ता अडवून अडथळे बसविण्यात आले आहेत. 

वाहतुकीसाठी केवळ एकच मार्गिका शिल्लक राहिल्यानं तीन हात नाक्यावर वाहतुकीसाठी काही मार्गांमध्ये बदल केलेत. त्याचा फायदा वाहतूक कोंडीसाठी होईल असं वाहतूक विभाग सांगतोय. पण प्रत्यक्षात वाहतूक कोंडीतून सुटका होतच नाहीय. अपघातांची शक्यताही मोठ्या प्रमाणावर आहे. 

एकीकडे मेट्रोमुळे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे ठाण्यातला निमुळता कोपरी पूल... घोडबंदर रोड किंवा नाशिक रोडवरून ठाण्याकडे वाहन सुसाट येतात परंतु कोपरी पुलाकडे येताच वाहनांचा वेग कमी होतो. पर्यायानं वाहतूक कोंडीत भर पडते.

ठाणे-कळव्याला जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानंही वाहतूक कोंडी होतेय. याठिकाणी पालिकेचं रुग्णालय असल्यानं रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागतोय. 

ठाण्यातील मेट्रो, उड्डाणपुलाची कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत ठाणेकर आणि त्याचबरोबर मुंबई आणि नवी मुंबईतून या भागात प्रवास करणाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका शक्य नाही.