कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला

या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याच्या वृत्ताने एकच गोंधळ उडाला. कोयना जलविद्युत टप्पा क्र. 1 आणि 2 च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधुन आणि छतामधुन पाण्याची गळती झाली

Updated: Nov 8, 2022, 11:22 PM IST
कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा: कोयना धरणावरील(Koyna Dam) कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मात्र, आज या प्रलकल्पात काही तरी तांत्रिक बिघाड झाला. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले. यामुळे हजारो लिटर पाणी(Water leakage) वाया गेले. अखेरीस यातील तांत्रित बिघाडाचे कारण शोधण्यात प्रकल्प अधिकाऱ्यांना यश आले. तातडीने उपयायोजना केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये बांधण्यात आलेय कोयना धरण

सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना धरण बांधण्यात आले आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेले हे धरण  महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या मोठ्या धरणांमध्ये महाराष्ट्राच्या या कोयना धरणाचा समावेश होतो. आहे. 

धरणाच्या कॅनलला गळती लागली

या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याच्या वृत्ताने एकच गोंधळ उडाला. कोयना जलविद्युत टप्पा क्र. 1 आणि 2 च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधुन आणि छतामधुन पाण्याची गळती झाली.
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी विद्युत निर्मितीसाठीचे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते.  त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. 

ही सर्ज वेल 1960 साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात 100 मीटर खोल खोदलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे.  ही विहीर गेली साठ वर्ष तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के बसत असतात. मात्र, आता काही ठिकाणी तडे गेल्यामुळे सर्ज वेल मधून हे झिरपलेल पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयार यामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही

वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नसल्याचे कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या दुरुस्तीसाठी वीज निर्मिती बंद ठेवावी लागेल. सद्यस्थितीमध्ये ही गळतीचे अण्वेषण झालेले असून यासाठी गळती बंद करण्याची उपाययोजना प्रस्तावित असून आणि त्याप्रमाणे निविदा काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.