अर्णब गोस्वामीच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हं

अर्णब यांच्या विरोधातील हक्कभंग प्रकरणी आज विशेषाधिकार समितीची बैठक

Updated: Nov 5, 2020, 02:08 PM IST
अर्णब गोस्वामीच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हं  title=

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  विधानसभेतील हक्कभंग प्रकरणी कामकाज सुरू झाले आहे. अर्णब यांच्या विरोधातील हक्कभंग प्रकरणी आज विशेषाधिकार समितीची बैठक बोलावली आहे. 

अर्णबविरोधात हक्कभंग मांडणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. अर्णबविरोधातील हक्कभंग प्रकरणी प्राथमिक चर्चा करण्यासाठी सरनाईक यांना विशेषाधिकार समितीने बैठकीला बोलवलं आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अवमानप्रकरणी अर्णबविरोधात प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंग मांडला होता. 

 अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गोस्वामी यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण पोलीस कोठडीची गरज नाही असं कोर्टाने म्हटलंय. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर अर्णब यांचे वकील आबड पोंडा आणि गौरव पारकर यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात पोलिसांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. काल रात्री तब्बल सहा तास न्यायालयात सुनावणी झाली. 

अलिबाग इथे दाखल झालेली एफआयआर रद्द व्हावी अशी मागणी करणारी याचिका अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज दुपारी ३ वाजता हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरा ही सुनावणी संपल्यामुळे अर्णब यांना कालची संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्येच काढावी लागली.