भाजप घेणार गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याची 'दक्षता'

सहा जणांची समिती केली स्थापन

Updated: Jan 18, 2022, 09:59 PM IST
भाजप घेणार गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याची 'दक्षता' title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू झाले आहेत. गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे हे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली दक्षता समितीची स्थापना केली आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या साथीने शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांच्यामुळे हिंदू समाज अस्तित्वात आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामुळे राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत.

काही दिवसांपूर्वी किल्ले रायगडावरील मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून, चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याविरोधात छत्रपती खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. मात्र, येथील स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले. दुर्दैवाने राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. 

शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक 'सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे असा बोर्ड झळकला. या प्रकारांविरोधात तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात.

ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशिर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. 

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. तो पक्ष गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करत असला तरी भारतीय जनता पार्टी शिवरायांच्या इतिहासात बदल करणे सहन करणार नाही. त्यामुळेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करणार आहे. 

यांचा आहे दक्षता समितीत समावेश
अध्यक्ष - रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर ( खासदार, माढा ) 
सदस्य – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ( खासदार ) 
नितीनराजे शिंदे ( माजी आमदार, सांगली )
विक्रम पावसकर ( सातारा जिल्हाध्यक्ष )
वर्षा डहाळे ( महिला मोर्चा चिटणीस) 
मार्गदर्शक - सुनिल देवधर ( राष्ट्रीय सचिव )