लॉकडाऊनचे निर्बंध धाब्यावर : 'या' रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी, पोलिसांचेही दुर्लक्ष

रेल्वे स्थानकात नियम धाब्यावर

Updated: Apr 15, 2021, 09:37 AM IST
लॉकडाऊनचे निर्बंध धाब्यावर : 'या' रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी, पोलिसांचेही दुर्लक्ष title=

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : संपूर्ण राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या रुगणसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल रात्रीपासून राज्यभरात संचार बंदीसह कडक निर्बंध लागू केलेत. रेल्वेसह सार्वजनिक वाहतूकीसाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आलीय. पण कल्याण रेल्वे स्थानकात नियमांचे तीन-तेरा वाजलेले दिसतायत. मर्यादेपेक्षा जास्त गर्दी, नियमांचे उल्लंघन आणि त्याहून भयंकर म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवणारे कोणीही नाही. 

कल्याण रेल्वे स्थानकावर काल दुपारपासूनच बॅरिगेटिंग करण्यात आले होते. फक्त दोन गेट खुले ठेवण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नव्हती.

निर्बंधांच्या अंमलबजावणीचा पाहणी करणारे रेल्वेचे पोलीस दल या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे प्रवाशी निर्बंध झुगारुन प्रवास करताना दिसत होते. स्थानकाबाहेर रिक्षांची गर्दी दिसून आली. एकूणच इतर दिवसांइतकीच लोकलमध्ये प्रवासी दिसले. त्यामुळे नेहमी प्रमाणेच गर्दी पहायला मिळाली. ही गर्दी रोखण्याचे आव्हान शासनासमोर आहे.

कोरोना रुग्ण वाढले

राज्यात काल ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर राज्यात २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२८,०२,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,७८,१६०  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,५५,२०६ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्येआहेत तर २८,४९४ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. मुंबईत 9935 कोरोना रुग्णांची नोंद तर 54 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर  राज्यात 58,952 रूग्णांची नोंंद , 278 जणांचा मृत्यू झाला आहे.