Mhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Mhada Lottery : तुम्हीही मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पाहताय का? म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर उरलाय फक्त एक आठवडा. आताच कागदपत्र आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करा आणि पाहा ही माहिती.   

सायली पाटील | Updated: Jul 3, 2023, 10:10 AM IST
Mhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस  title=
Mumbai Mhada lottery latest update

Mhada Lottery 2023 : मुंबईत हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा. या शहरात असणाऱ्या सुखसोयी, इथं असणारं नव्या पिढीचं भवितव्य आणि नोकरीच्या संधी या आणि अशा असंख्य कारणांमुळं या शहरात किंवा उपनगरीय क्षेत्रांमध्ये घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, सर्वांनाच या शहरातील घराचं स्वप्न साकार करता येतं असं नाही. येणारी मिळकत खर्चातच संपते आणि घराचं स्वप्न स्वप्नच राहतं. आता मात्र तुमच्या या स्वप्नांना बळ मिळणार आहे. मदतीसाठी नेहमीप्रमाणं सरसावलंय ते म्हणजे म्हाडा. (Mumbai Mhada lottery latest update )

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तब्बल 4082 घरांच्या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल 98 हजार आणि त्याहून अधिक अर्ज भरले गेले आहेत. जवळपास 72 हजार अर्ज अनामत रकमेसह दाखल करण्यात आले असून, तुम्ही आतापर्यंच अर्ज भरला नसेल, तर त्वरा करा. कारण आता अर्ज भरण्यासाठी आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. 

हेसुद्धा वाचा : Sharad Pawar VIDEO : 'हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं';  वयाच्या 83 व्या वर्षी नव्यानं पक्षबांधणीसाठी शरद पवार सज्ज 

साधारण 22 मे पासून म्हाडाच्या मुंबई मंडळासाठीच्या घरांची अर्जविक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरु झाली आणि तेव्हापासूनच या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये आरटीजीएस- एनईएफटीसह अनामत रक्कम भरण्यासाठीची मुदत म्हाडाकडून 28 जूनऐवजी 12 जुलैपर्यंच पुढे ढकलण्यात आली. ज्यामुळं काही कारणास्तव अर्ज दाखल करु न शकलेल्यांना मोठा दिलासाच मिळाला आहे. त्यामुळं तुम्हीही आर्थिक जुळवाजुळव किंवा कागदपत्रांच्या गोंधळात अडकला असाल, तर आता घाई करा आणि घरासाठीचा अर्ज दाखल करा. 

का देण्यात आली मुदतवाढ? 

अनेकांना अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला काहीसा दिरंगाईनं मिळाल्यामुळं आणि अर्जविक्री – स्वीकृतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज दाखल करण्यासाठीच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जांची संख्या एक लाखांचा टप्पा पार करेल. शिवाय आता कोणाचं नशीब फळफळणार आणि कोणाला हक्काचं घर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.