मंत्र्यांना 'हिजडा' संबोधणाऱ्या निलेश राणेंनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं.  

Updated: May 21, 2020, 02:36 PM IST
मंत्र्यांना 'हिजडा' संबोधणाऱ्या निलेश राणेंनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना खडे बोल सुनावले आहेत. 
माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय नेतेमंडळींना तरी किमान याचं भान असावं अशा शब्दांत आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांचा खरपूस समाचार घेतला.

निलेश राणेने यांनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी असं म्हणत त्यांच्या क्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात 499, 501 अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा फैजपुर (जळगांव) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांचा एका राज्यमंत्र्यांसमवेत सोशल मीडियावर राजकीय कारणावरुन वाद सुरु आहे.  यादरम्यानच राणे यांनी ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने उल्लेख करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या.

कोणीतरी ‘हिजडा' राज्यमंत्री आहे, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले ...अशा शब्दांत त्यांनी हे ट्विट केलं होतं. 

 

दरम्यान, निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याचे तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले होते. 2014 च्या दीर्घ अहवालाअंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली आहे.