लॉटरीने भाजीवाला करोडपती पण, नियतीमुळे पुन्हा रोडपती

....दुर्दैव असे की त्याला कोट्यधीश झालेले पाहणे बहुदा नियतीच्या मनात नव्हते. त्याचा हा आनंद दिर्घकाळ टीकला नाही.

Updated: Jun 12, 2018, 02:15 PM IST
लॉटरीने भाजीवाला करोडपती पण, नियतीमुळे पुन्हा रोडपती title=

मुंबई : भाजीची गाठोडी, अंगमेहनतीचे काम आणि वाढती महागाई या नेहमीच्या जीवनला कंटाळलेल्या एका भाजीवल्याने करोडपती व्हायचे स्वप्न पाहिले. पण, नुसते स्वप्न पाहून करोडपती होता येत नाही. त्यासाठी तितके कष्टही करावे लागतात. कष्ट करून करोडपती व्हायचे तर, त्यासाठी वेळ जाणार. मग, अनेक लोक निवडतात तोच पर्याय या भाजीवाल्याने निवडला. त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले. आश्चर्य असे की, त्याला चक्क १ कोटी ११ लाखाची लॉटरी लागली. पण, दुर्दैव असे की त्याला कोट्यधीश झालेले पाहणे बहुदा नियतीच्या मनात नव्हते. त्याचा हा आनंद दिर्घकाळ टीकला नाही.

बारकोडवरून तिकीटाची पडताळणी

घटना आहे राजधानी मुंबईतील. भाजी विक्रेता सुहास कदम (वय ४४ वर्षे) यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कदम यांनी तक्रारीत दावा केला आहे की, त्यांना १ कोटी ११ लाख रूपयांची लॉटरी लागली. पण, लॉटरीचे पैसे घेण्यासाठी ते जेव्हा वाशी येथील लॉटरी विभागाच्या मुख्यालयात पोहोचले तेव्हा, त्यांना सांगण्यात आले की, या बंपर लॉटरीवर तीन लोकांनी दावा केला आहे. कदम यांच्यासह आणखी तिघांकडे एकाच सीरियलचे नंबर होते. मग अधिकाऱ्यांनी अधिकृत तिकीटधारकास ते पैसे दिले. बारकोडवरून तिकीटाची पडताळणी करण्यात आली आणि त्या व्यक्तिला पैसै दिल्याचे त्यांना सांगण्यात आले.

नकली लॉटरी तिकीटांचा खेळ

दरम्यान, कदम यांच्यासोबत घडलेल्य प्रकारामुळे या परिसरात लॉटरीच्या नकली तिकीटांचा काळाबाजार जोरदार सुरू अल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईत सुमारे ४ हजार लॉटरी स्टॉल आहेत. या स्टॉलवरून प्रतिदिन सुमारे १५ कोटी रूपयांची तिकीटविक्री होते.

दरम्यान, सुहास कदम यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कदम हे गेली ५ वर्षे लॉटरीची तिकीटे खरेदी करत आहेत. पण, त्यांना २०० पेक्षा अधिक रक्कम कधीच जिंकता आली नाही. लॉटरी लागल्याचे पाहून मी बायको, मुलांना नवे घर घेण्याचे अश्वासन दिले. तसेच, लॉटरी लागल्याचे समजताच अनेक लोक मला भेटायला येत आहेत. पण, आता त्यांना कसे सांगू अकाऊंटवर पैसेच नाहीत, असा प्रश्न कदम यांना पडला आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, कदम यांनी १६ मार्च रोजी कल्याण रेल्वे स्टेशनजवळी लॉटरी स्टॉलवरून १०० रूपयांची ५ तिकीटे खरेदी केली. यातील एका तिकीटावर त्यांना जॅकपॉट लागला. या लॉटरीची सोडत २० मार्चला झाली. कदम यांनी अधिकृत लॉटरी केंद्रातून नकली तिकीट मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्य लॉटरी विभागाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.