Bhanushali building collapse : इमारतीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार- किशोरी पेडणेकर

महापौरांचा इमारतीच्या मालकाला इशारा   

Updated: Jul 16, 2020, 07:27 PM IST
Bhanushali building collapse : इमारतीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार- किशोरी पेडणेकर  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : शहरात कोरोना व्हायरसचं थैमान आणि पावसाची कोसळधार सुरु असतानाच फोर्ट परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. जीपीओ कार्यालयासमोर असणाऱ्या bhanushali भानुशाली इमारतीचा बहुतांश भाग गुरुवारी कोसळला. अत्यंत जुन्या अशा या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलापासून पालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासह सर्वांनी या भागात दाखल होत बचाव कार्यास सुरुवात केली.

सकाळपासूनच इमारतीचा काही भाग कोसळला होता. याबाबत इमारतीच्या मालकाला माहितीही देण्यात आली होती. पण, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दुपारच्या सुमारास इमारतीच्या काही भागाला तडा गेला. त्याचवेळी रहिवाशांना बाहेर काढण्यातही आलं. पण, हाताळई अत्यंत कमी वेळ असल्यामुळं अखेर ही इमारत कोसळली आणि काही रहिवाशी ढिगाऱ्याखाली आले, अशा माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 

इमारतीच्या मालकाकडून परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात येत आहे. त्यामुळं आता या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण, असाच उदविग्न प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

महापौरांचा इमारतीच्या मालकाला इशारा 

फोर्ट परिसरातील सी १ प्रवर्गात मोडणाऱ्या या इमापरतीच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले होते. पण, इमारतीच्या मालकाकडून मात्र याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही. किंबहुना इमारतीच्या मालकाला याबाबतची नोटीसही वारंवार देण्यात येत होती. पण, इमारतीचा मालक आणि रहिवाशी यांच्यामध्ये असणाऱ्या वादामुळं दुरुस्तीचं काम काही होऊ शकलं नाही, ज्यामुळं हे संकट ओढावलं गेलं. त्यामुळं इमारतीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. 

 

Mumbai Mayor | Kishori Pedhnekar On Part Of Bhanushali Building Collapsed

Posted by Zee 24 Taas on Thursday, July 16, 2020

दरम्यान, अत्यंत जुन्या अशा या इमारतीचा उर्वरित भागही धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात इमारतीच्या जिन्याचाच भाग कोसळल्यामुळं दुसऱ्या भागातील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी आता घरांच्या खिडक्यांचा वापर केला जात आहे. अग्निशमन दलाच्या मदतीनं या रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे.