विना फास्टॅग गाड्यांना टोलनाका क्रॉस करता येणार नाही !

 मुंबईत 26 जानेवारीपर्यंत फास्टॅग (Fastag) अनिवार्य असल्याचा निर्णय 

Updated: Dec 30, 2020, 11:20 AM IST

मुंबई : मुंबईत 26 जानेवारीपर्यंत फास्टॅग (Fastag) अनिवार्य असल्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतलाय. 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालंय. मुंबईत चारचाकी गाड्यांना फास्टॅगसाठी 26 जानेवारीची डेडलाईन देण्यात आलीये. त्यामुळे 26 जानेवारीपासून चार चाकी वाहनांना मुंबईत फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे.

मुंबईतील 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत विना फास्टॅग गाडीला टोला नाका क्रॉस करता येणार नाही.

मुंबईतील दहिसर टोलनाका सोडता अन्य चार ठिकाणच्या टोल नाक्यावरील सेंसर तसंच इतर तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत.

मुंबई पुणे एक्स्पप्रेस हायवे आणि वांद्रे वरळी सी लिंक रोडवर फास्टॅग लावले गेले आहेत. 

सध्या विना फास्टॅगसाठी काही लाईन चालू आहेत मात्र त्या काही दिवसांसाठीच चालू असतील. येत्या 26 जानेवारीपासून अनिवार्य फास्टॅगचा नियम लागू करण्यासंबंधी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

आता सर्व चारचाकी (Four Wheelers) वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टॅग’ (fastag) अनिवार्य केलाय. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले असून यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आलाय.. विशेष म्हणजे हा नियम १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसाह M आणि N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.

विना फास्टॅग वाहनांनी फास्टॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येतो. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झालंय. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो.

सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. 

वाहनावर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल व टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातात. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळते

टोलनाके कॅशलेस झाल्याने तसेच फास्टॅगच्या येण्याने कर्मचाऱ्यांसोबतच वाहनचालकांचा देखील वेळ वाचणार आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी तसेच नसण्याच्या बरोबरच होईल. आपत्कालिन स्थितीत कोणालाही टोल नाक्यांवरील रांगेत राहण्याची गरज नसेल. फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर  फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे.