पवार काका-पुतण्यांनी आंदोलन पेटवलं- खोत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं.

Updated: Nov 14, 2012, 02:12 PM IST

www.24taas.com, सांगली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं. ऊसदर आंदोलन पवार काका-पुतण्यांनी पेटवल्याचा आरोप सदभाऊंनी केलाय. राजू शेट्टींवर जातीयवादी टीका केल्यानं पवारांचे खरे रुप समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय.
इंदापूर कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका झालीय. ऊसदर आंदोलनप्रकरणी त्यांना अटक झाली होती. तसंच खासदार राजू शेट्टी यांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला असून उद्या त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.
ऊस दरवाढीच्या मुद्यावर तिनही संघटनांची एकजूट झालीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोबतीनं तीन्ही शेतकरी संघटना आंदोलनात उतरणार आहेत. आंदोलनात मृत्यू झालेल्या चंद्रकांत नलावडेच्या रक्षाविसर्जन विधीच्या वेळी रघुनाथदादा पाटील यांनी ही घोषणा केलीये.