आज पुन्हा टीहरीमध्ये ढगफूटी, तीन ठार!

उत्तराखंडवर पुन्हा एकदा निसर्गानं आपली अवकृपा दाखवून दिलीय. पुरात सगळंच उद्ध्वस्त झाल्यानंतर आज ‘टेहरी’च्या देवप्रयाग भागात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ढगफूटी झाली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 25, 2013, 05:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडवर पुन्हा एकदा निसर्गानं आपली अवकृपा दाखवून दिलीय. पुरात सगळंच उद्ध्वस्त झाल्यानंतर आज ‘टेहरी’च्या देवप्रयाग भागात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ढगफूटी झाली. यामध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळतेय. सोबतच या भागातील सगळी घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
उत्तराखंडच्या अनेक भागांत पाऊस, भूस्खलन आणि ढगफूटी अशा प्रकारच्या निसर्गाच्या अवकृपेनं आपला प्रभाव दाखवून दिलाय. या भागात अडकलेल्या लोकांना घटनास्थळावरून हलवण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. अजूनही या भागात ९००० लोक अडकल्याची भीती आहे. दरम्यान, सोमवारी जवळपास १००० जणांना वाचवण्यात यश आलं होतं. या भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारनं अन्य राज्यांना एकतर्फी पद्धतीनं बचावकार्य करण्यास बंदी घातलीय. बद्रीनाथच्या उंचावर अडकलेल्या पाच हजार तीर्थकरूंमधल्या केवळ १६४ जणांना वाचवण्यात यश आलंय. सहा आसनी विमानांतून त्यांना जोशीमठात पोहचवलं गेलंय.

लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) गेल्या आठवड्यापासून इथं अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.