चिटफंडद्वारे जनतेला लुटणारे आरोप करतात, मोदींचा ममतांना टोला

चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत आहेत

Updated: Nov 20, 2016, 05:27 PM IST
चिटफंडद्वारे जनतेला लुटणारे आरोप करतात, मोदींचा ममतांना टोला title=

आग्रा : चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर केली आहे. पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.

मोदींच्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह सगळ्याच विरोधी पक्षांनी टीका केली होती. मोदींनी हा निर्णय मागे घेण्याची मागणीही ममता बॅनर्जींनी केली होती. ममतांच्या या मागणीचा पंतप्रधानांनी खरपूस समाचार घेतला आहे. आग्रामध्ये आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते.

नोटबंदीमुळे देशवासीयांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यामुळे देश सोन्याप्रमाणे उजळून निघेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. जुन्या पाचशे, हजारच्या नोटबंदीमुळे ज्यांनी देशाला लुटलं त्यांची झोप उडाल्याची टीकाही त्यांनी केली. गरीबांना त्यांच्या हक्काचा निवारा देण्यासाठी नियोजनबद्ध पावलं उचलली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.