पंतप्रधान बोलत नाही म्हणताय, मग हे पाहा....

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी सतत ‘मौनीबाबा’ म्हणून टीका केलीय. पण, या सगळ्या विरोधकांना पंतप्रधानांनी तोंडावर पाडलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 23, 2013, 12:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी सतत ‘मौनीबाबा’ म्हणून टीका केलीय. पण, या सगळ्या विरोधकांना पंतप्रधानांनी तोंडावर पाडलंय. ‘पीएमओ’च्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षात तब्बल १,३०० भाषणं ठोकलीत. म्हणजेच... वर्षाला जवळजवळ दीडशे.

डॉ. मनमोहन सिंग यांनी मे २००४ साली सुरू केलेल्या आपल्या पंतप्रधान म्हणून सुरू केलेल्या कारकिर्दीत आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी १,३०० भाषणं दिलीत. २४ जून २००४ पासून पंतप्रधानांनी केलेल्या वेगवेगळ्या भाषणांचा संपूर्ण रेकॉर्ड ‘पीएमओ’नं जपून ठेवलाय. मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदावर गेल्या नऊ वर्षांपासून म्हणजेच जवळजवळ ३,३२५ दिवसांपासून कार्यरत आहेत. याचाच अर्थ ते प्रत्येक तीन दिवसानंतर एक भाषण ठोकतात.
पंतप्रधानांनी मीडियाशी राजधानी दिल्लीत जाहीररित्या केलेला वार्तालाप तसा दुर्मिळच राहिलाय. परंतु, त्यांनी परदेशभ्रमंतीवर जाताना मात्र मीडियाशी वार्तालाप करण्याची एकही संधी सोडलेली नाही. बऱ्याचदा हे वार्तालाप ‘आकाशातच’ (ऑन बोर्ड) झालेत. तेही, राजकारण, अर्थकारण आणि परकीय नीती अशा विविध विषयांवर...

‘पीएमओ’नं ही माहिती ट्विटरद्वारे जनतेशी शेअर केलीय. ‘पीएमओ’नं ठेवलेल्या भाषणांच्या रेकॉर्डमध्ये, विविध मंत्र्यांद्वारे आयोजित केलेल्या कॉन्फरन्सचा सुरुवात आणि शेवट करणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणांचाही समावेश आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.