नांदेडमध्ये 'वरुण' आला पण 'पिक' गेलं

जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न होता. मात्र हीच अतिवृष्टी आता शेतक-यांसाठी डोकेदुखी ठरते आहे. 

Updated: Oct 18, 2016, 04:12 PM IST
नांदेडमध्ये 'वरुण' आला पण 'पिक' गेलं title=

नांदेड : जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न होता. मात्र हीच अतिवृष्टी आता शेतक-यांसाठी डोकेदुखी ठरते आहे. 

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं शेतीपिकांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्ह्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस पडला आहे. कंधार आणि लोहा तालुक्यात तर सरासरीच्या दीडपट पाऊस झाला आहे. मन्याड नदीला आलेल्या पुराचं पाणी हजारो हेक्टर शेतीत घुसलं. आजही अनेक पिकं या पाण्याखालीच असल्यानं शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे.

पुराचं पाणी शेतात घुसल्याचं प्रशासनानंही मान्य केलं असून सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरु असल्याचं ग्रामविकास अधिका-यांनी सांगितलंय. तर केवळ पिकविम्याची रक्कम देऊन शेतक-यांना दिलासा मिळणार नसून विशेष पॅकेज देण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केली आहे.

गेली तीन वर्षे कोरड्या दुष्काळानं शेतक-यांवर संकट आलं. यंदा मात्र वरुणराजा बरसला खरा मात्र अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे.