ठाण्यात ‘राज’ की बात, सेनेचा महापौर?

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Updated: Mar 6, 2012, 01:13 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

मनसेने ठाणे महानगरपालिकेत तटस्थ राहून शिवसेनेला मदत करावी, तर नाशिक महापालिकेत शिवसेनेने तटस्थ राहून मनसेला मदत करावी, अशी रणनिती आखली जात आहे. त्यानुसारच राज ठाकरे आज आपल्या सात नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे सांगणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर ठाणे महापालिकेत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.  राज ठाकरे यांची पत्रकार परिषद ठाण्याच्या गर्व्हमेंट रेस्ट हाऊस येथे होणार आहे. त्यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील.

 

 

आज महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिकेत शिवसेनेकडे सर्वाधिक 53 जागा आहेत. तर मित्रपक्ष भाजपकडे 8 आणि रिपाईकडे 1 जागा आहे. बसपाचे दोन नगरसेवक आणि दोन अपक्षांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे महायुतीच्या जागांची संख्या 66 होते आहे.

 

 

दुसरीकडे राष्ट्रवादीकडे 34 जागा आहेत. काँग्रेसकडे 18 जागा आहेत. पाच अपक्षांनी आघाडीला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे आघाडीचं संख्याबळ 57 वर पोहचलय. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 66 चा आकडा गाठण्यासाठी त्यांना 9 जागांची आवश्यकता आहे. महापालिकेत मनसे सदस्यांची संख्या 7 आहे. या निवडणूकीत मनसेनं अद्याप कुणालाही पाठिंबा दर्शवलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसे तटस्थ राहणार असल्याने सेनेच्याच महापौराच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता आहे.

 

महायुतीतर्फे महापौरपदासाठी हरिश्चंद्र पाटील यांना तर उपमहापौरपदासाठी मिलिंद पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. आघाडीतर्फे महापौरपदासाठी नजीब मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी भरत चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण झाल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. आघाडी आणि युतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्यायते. आता सत्तास्थापनेसाठी महायुती आणि आघाडीची रणनिती कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.