त्या ऐतिहासिक खेळीला झाली 15 वर्ष

क्रिकेटला भारतामध्ये आजही अनेक जण धर्म मानतात. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये आजही भारत जिंकला तर फटाके वाजतात आणि पराभव झाला की क्रिकेटपटूंचे पुतळे जाळले जातात. 

Updated: Mar 14, 2016, 05:35 PM IST
त्या ऐतिहासिक खेळीला झाली 15 वर्ष title=

मुंबई: क्रिकेटला भारतामध्ये आजही अनेक जण धर्म मानतात. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये आजही भारत जिंकला तर फटाके वाजतात आणि पराभव झाला की क्रिकेटपटूंचे पुतळे जाळले जातात. 

क्रिकेटवेड्या असलेल्या या देशानं असाच एक इतिहास अनुभवला होता 14 मार्च 2001 ला म्हणजेच आजपासून बरोबर 15 वर्षांपूर्वी. 

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविडनं क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे याच दिवशी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं. याच दिवशी कोलकत्याच्या ऐतिहासिक अशा इडन गार्डनवर इतिहास घडला. 

राहुल द्रविड आणि लक्ष्मणमध्ये झालेल्या तब्बल 376 रन्सच्या पार्टनरशिपमुळे भारतानं फॉलो ऑन मिळाल्यानंतरही जोरदार मुसंडी मारली, आणि ही मॅच जिंकून स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाला लोळवलं. 

या ऐतिहासिक पार्टनरशिपमध्ये लक्ष्मणनं 281 रन तर द्रविडनं 180 रनची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियापुढे 75 ओव्हरमध्ये 384 रनचं टार्गेट ठेवलं. 

लागोपाठ 16 टेस्ट जिंकणारी ऑस्ट्रेलियाही माघार घेणारी नव्हती आणि त्यांनीही भारताला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. पाचव्या दिवसाचा टी झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 161 रनवर 3 विेकेट गेल्या होत्या. ही मॅच ड्रॉ होईल असाच अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला होता. 

पण त्यानंतर मात्र हरभजन नावाचं वादळ इडन गार्डनवर आलं आणि कांगारूंचा चक्काचूर झाला. शेवटच्या दोन तासांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट पडल्या आणि भारतानं ही मॅच जिंकत इतिहास घडवला. 

पाहा त्या ऐतिहासिक इनिंगचा व्हिडिओ