युपीत सहाव्या टप्प्यात ६० टक्के मतदान

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. विधानसभेच्या ६८ जागांसाठी हे मतदान झालं. या टप्प्यात सुमारे ६२ टक्के मतदान झालं. आता उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीचा एकच टप्पा बाकी राहिला आहे

Updated: Feb 29, 2012, 10:26 AM IST

www.24taas.com, लखनऊ

 

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. विधानसभेच्या ६८ जागांसाठी हे मतदान झालं. या टप्प्यात सुमारे ६०.०८ टक्के मतदान झालं. आता उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीचा एकच टप्पा बाकी राहिला आहे.

 

सातव्या टप्प्यातल्या मतदानानंतर ६ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर मायावतींचं राज्य राहणार की जाणार हे स्पष्ट होईल. उतरप्रदेशमध्ये सहाव्या  टप्प्यासाठी १३ जिल्हांतील ६८ जागांसाठी हे मतदान झाले. निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला होता.

 

६८ जागांसाठी ८६ महिलांसहित एकूण ११०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. उतरप्रदेशमध्ये पश्चिम भागात  दिग्गज उमेदवार उभे आहेत.  यामुळे गौतमबुद्धनगर (नोएडा), गाजियाबाद, मेरठ, बागपत, बुलंदशहर, आग्रा, मथुरा, अलीगढ, हाथरस, प्रबुद्धनगर, पंचशीलनगर, मुजफ्फरनगर आणि सहारनपूर या जिल्हांकडे लक्ष लागले आहे. ६८ जागांचे भवितव्य २.१४ कोटी मतदान ठरवणार आहेत.

 

मायावतींच्या बसपा सरकारमधील पाच मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात रामवीर उपाध्याय हे हाथरसमधून तर बरौलीतून जयवीर सिंह, मेरठमधून वेदराज भाटी, चौधरी लक्ष्मी नारायण हे मथुरातून तर सहारनपूरमधून धर्मसिंह सैनी लढत आहेत. त्यामुळे या मतदार संघाकडे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रीय लोकदल (रालोद) प्रमुख अजित सिंह यांचे पुत्र  जयंत चौधरी , भारतीय जनता पक्षाचे नेते  हुकुम सिंह, जनक्रांती पार्टीचे (राष्ट्रवादी)  अध्यक्ष राजवीर सिंह, माजी मंत्री हाजी याकूब कुरैशी तसेच रालोद नेते  कोकब हमीद यांचे भवितव्य  यंत्रात बंद झाले आहे