दिल्लीत पाऊस नसतानाही पुराने थैमान का घातलं आहे? पाणी नेमकं येतंय कुठून?

राजधानी दिल्लीला सध्या पुराने घेरलं आहे. दिल्ली पुराच्या  धोक्यात असून, यमुना नदीतील पाण्याची पातळीही वाढली आहे. यमुना नदीने धोक्याची 205 मीटरची पातळी ओलांडली असून, पाणी अद्यापही वाढत आहे. पण दिल्लीत पाऊस थांबलेला असतानाही पूर का आला आहे? आणि धोका वाढत का चालला आहे? हे समजून घ्या...  

Jul 13, 2023, 17:50 PM IST
1/10

राजधानी दिल्लीला सध्या पुराने घेरलं आहे. दिल्ली पुराच्या  धोक्यात असून, यमुना नदीतील पाण्याची पातळीही वाढली आहे. यमुना नदीने धोक्याची 205 मीटरची पातळी ओलांडली असून, पाणी अद्यापही वाढत आहे. पण दिल्लीत पाऊस थांबलेला असतानाही पूर का आला आहे? आणि धोका वाढत का चालला आहे? हे समजून घ्या...  

2/10

गुरुवारी सकाळी 8 वाजता, पाण्याची पातळी 208.48 मीटर इतकी होती. यानिमित्ताने 1978 मध्ये निर्धारित केलेली 207.49 मीटरची आतापर्यंतची सर्वाधिक पातळी यावेळी ओलांडण्यात आली आहे.   

3/10

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आणि आजुबाजूच्या परिसरात पडलेला मुसळधार पाऊस आणि हरियाणाच्या हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडण्यात आलं असल्याने राजधानी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पण तज्ज्ञांनी दिल्लीमधील या स्थितीमागे इतर कारणंही असल्याचं सांगितलं आहे.   

4/10

केंद्रीय जल आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "हथिनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेलं पाणी आधीच्या वर्षांशी तुलना करता दिल्लीत पोहोचण्यास कमी वेळ घेत आहे. अतिक्रमण आणि गाळ ही यामागील मुख्य कारणं आहेत. याआधी पाणी वाहून जाण्यासाठी जास्त जागा होती. आता मात्र त्याला पार जागा उपलब्ध नाही".  

5/10

हिमाचल प्रदेशात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून उत्तरेकडील या मुसळधार पावसामुळे बॅरेज भरले आहे. राजधानीपासून 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरियाणातील यमुनानगर येथील बॅरेजचे पाणी दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते तीन दिवस लागतात.  

6/10

इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) मधील नैसर्गिक वारसा विभागाचे प्रधान संचालक मनू भटनागर यांनी अल्प कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे यमुनेने धोक्याची पातळी ओलांडल्याचं सांगितलं आहे.   

7/10

दीर्घ कालावधीत समान प्रमाणात पाणी पडल्यास अशी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण यामुळे पाण्याला जाण्यास वेळ मिळतो असं त्यांनी स्पष्ट केलं.   

8/10

साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स, पिपलचे (SANDRP) सहयोगी समन्वयक भीम सिंग रावत म्हणाले की, नदीच्या पाण्यात गाळ साचल्याने उंची वाढली असून, यमुनेच्या पाण्याच्या पातळीत अभूतपूर्व वाढ झाली आहे.   

9/10

"वझिराबाद ते ओखला पर्यंतच्या 22 किलोमीटर लांबीच्या नदीतील 20 पेक्षा जास्त पूल प्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे नदीपात्रात गाळ साचतो. यामुळे प्रवाहात मधील अनेक ठिकाणी वाळूच्या पट्ट्या तयार होतात," असं त्यांनी सांगितलं आहे.   

10/10

दरम्यान, दिल्लीतील स्थिती आणखी खराब होण्याची भीती असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. एनडीआरएफची 12 पथकं सध्या बचावकार्यासाठी मैदानात कार्यरत आहे.