1/7
स्मिता साळसकर, शहीद विजय साळसकर यांची पत्नी
२६/११ या मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्याने खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे... हिच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे, असे शहीद झालेले पोलीस अधिकारी विजय साळसकर यांची पत्नी स्मिता साळसकर यांनी म्हटलंय.
कसाबला फाशी होईल की नाही, याविषयी शंका होती. पण, आज त्याला फासावर लटकविण्यात आल्याने मला आनंद होत असल्याचे, स्मिता साळसकर यांनी सांगितले. या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानमध्ये बसले असून, त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय समाधान मिळणार नाही. कसाबच्या फाशीमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे, असे त्या म्हणाल्या.
कसाबच्या फाशीमुळे जगात एक चांगला संदेश गेला आहे. त्यामुळे आनंद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमची एकच मागणी होती की कसाबला फाशी द्या, ती आज पूर्ण झाली आहे, असे साळसकर म्हणाल्या. तसेच संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूलाही लवरात लवकर फाशी दिली पाहीजे. तर कसाबच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे स्मिता साळसकर यांनी म्हटलंय.
2/7
संजय राऊत, प्रवक्ता, शिवसेना
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला फाशी देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने जगाला दाखवून दिले आहे की, आम्ही किती सक्षम आहोत. देण्यात आलेली कसाबला फाशी ही बाळासाहेबांसाठी श्रद्धांजली आहे, असे राऊत यांनी ‘झी २४ तास’शी बोलताना सांगितले. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज मंगळवारी फेटाळला होता. राष्ट्रपती यांनी हा अर्ज फेटाळला ते योग्य होते आणि लगेच फाशी दिली, ही स्वागतार्ह बाब आहे, असे राऊत म्हणाले.
3/7
नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात
कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय.
अजमल कसाबनंतर आता अफजल गुरुच्या फाशीवरही लवकरात लवकर शिक्कामोर्तब व्हावं, अशी मागणी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलीय.
4/7
उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील
मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत आरोपी अजमल आमिर कसाब याला आज सकाळी पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर चढवलं गेलं. यावरच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी समाधान व्यक्त केलंय. कसालाला फाशी देऊन दहशतवाद्यांना कडक संदेश दिला गेल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. सरकारच्या वतीनं निकम यांनी २६/११चा खटला कसाबच्या विरुद्ध लढला होता. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्यूमुखी पडले होते.
‘मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबला फासावर दिल्यानं आपल्याला आनंदच झालाय... यालाही दोन कारणं आहेत... पहिलं म्हणजे मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळालाय आणि दुसरा म्हणजे आपण दहशतवाद्यांना या माध्यमातून कठोर संदेशही दिलाय’ अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलीय.
5/7
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया देताना कसाबचे येरवड्यामध्येच मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कसाबला आज सकाळी फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याला येरवड्यामध्येच मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आले. भारतात कायद्याचे राज्य मजबूत आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे, चव्हाण म्हणालेत. कायद्याच्या प्रक्रियेत कोणालाही वेगळा न्याय देण्यात येत नसून, प्रत्येकाला समान न्याय मिळतो, हेही यामुळे जाहीर झाले. कायद्याचा योग्य पालन केल्याचे हे उदाहरण आहे. सुरक्षेसाठी ही गुप्तता पाळण्यात आली होती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
6/7
सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे. कसाबची याचिका ५ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली होती, नोव्हेंबरला त्या फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी ७.३० मिनिटांनी त्याला फाशी देण्यात आली.
फाशी देऊन आम्ही २६ /११च्या मुंबई हल्ल्याच्या प्रकरणाची न्यायीक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कसाबला फाशी दिल्याचे आम्ही पाकिस्तानला कळविले आहे.
पाकिस्तानातील भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या सरकारला एका पत्राद्वारे ही माहिती दिली. पाकिस्तानने पत्र स्वीकारण्यास नकार केला, त्यामुळे आम्ही ही माहिती फॅक्सद्वारे कळविल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कसाबच्या फाशीसंदर्भात जी काही कारवाई करायची होती, ती मी माझ्याकडे फाईल आल्यावर तत्काळ केली. पाकिस्तानला या संबंधी माहिती कळविण्यात आली असून त्यांनी कसाबचा मृतदेह मागितला नाही.
7/7