ICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?

ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 28, 2023, 06:52 PM IST
ICC WC 2023 मध्ये  वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं? title=

ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: क्रिकेटमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची ((WC 2023 Scheduled) अखेर घोषणा करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात विश्व चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबरला सलामीचा सामना खेळवला जाणार असून 12 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. 46 दिवस खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देशातील 12 स्टेडिअम्सवर 48  सामने रंगतील. यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन (Round Robin) पद्धतीने खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यन (England vs New Zealand) खेळवला जाणार आहे. 

या 12 स्टेडिअमची निवड
प्रॅक्टिस मॅचसह स्पर्धेतील सर्व सामने 12 स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. यात हैदराबादर, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता या स्टेडिअम्सचा समावेश आहे. याशिवाय गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरमध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरमदरम्यान प्रॅक्टिस सामने खेळवले जाणार आहे. पण ज्या 12 स्टेडिअमवर विश्व चषक स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. 

मोहालीत सामना नाही
पंजाबमधल्या मोहाली स्टेडिअमवर विश्वचषकाचा एकही सामना नाही, त्यामुळे पंजाब क्रिकेट असोसिएशनने संताप व्यक्त केला आहे. तर काँग्रेस नेता शशि थरुर यांनी तिरुवनंतपुरमला यजमानपद न दिल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. 2011 विश्वचषक स्पर्धेत नागपूर आणइ मोहालीत सामने खेळवण्यात आले होते. याशिवाय यंदा नागपूरलाही यजमानपदाची संधी देण्यात आलेली नाही. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोहाली, नागपूरशिवाय इंदौर, राजकोट, रांची या महत्त्वाच्या क्रिकेट स्टेडिअमवरही विश्वचषचकाचे सामने खेळवले जाणार नाहीत. एमएस धोणीच्या रांची शहराला यजमानपद न मिळाल्याने स्थानिक क्रिकेट फॅन्स निराश झाले आहेत. 

अशी झाली स्टेडिअमची निवड
बीसीसीआने सुरुवातीला 12 क्रिकेट असोसिएशनच्या मैदानांची निवड केली होती. यात अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरु, धरमशाला, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदौर, राजकोट, मुंबई  यांचा समावेश होता. त्यानंतर क्रिकेट असोसिएशनच्या मागणीनंतर 15 ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. ज्यात मोहाली, पुणे आणि तिरुवनंतपुरम या मैदानांचा समावेश झाला. त्यानंतर बीसीसीआयने 10 स्टेडिअमवर शिक्कामोर्तब केलं आणि आधी निवडलेल्या ठिकाणांमधून इंदौर, गुवाहाटी आणि राजकोटला बाहेर केलं. यात पुण्याने बाजी मारली. तर तिरुवनंतपुरम, गुवाहाटी आणि हैदराबादमध्ये प्रॅक्टिस सामने ठेवण्यात आले. 

ठिकाणांच्या निवडीवरुन आता राजकारण
पंजाबचे क्रीडामंत्री गुरमीत सिंह मीत यांनी मोहालीला वगळल्याने जोरदार टीका केली आहे. स्टेडिअमची निवड करताना त्यात राजकारण केलं गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मोहाली क्रिकेट स्टेडिअम 1996 आणि 2011 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यांचं साक्षीदार आहे. पण यावेळी मोहाली स्टेडिअमला जाणूनबुजून वगळण्यात आलं असल्यााच आरोपही गुरमीत सिंह यांनी केला आहे. बीसीसीआयचं नेतृत्व कोण करतंय, हे सर्वांना माहित आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. दुसरकडे मोहालीत सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे यजमान पद न मिळ्याचं कारण बोललं जातंय. याशिवाय गेल्या एका वर्षात पंजाब क्रिकेट असोसिएशनचे 3 अध्यक्ष झाले आहेत. 

शशि थरूर यांचं ट्विट
काँग्रेस नेते शशि थरूर यांनीही विश्वचषक वेळापत्रकावर संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, तिरुवनंतपुरम स्टेडिअम भारतातलं सर्वश्रेष्ठ  स्टेडिअम मानलं जातं, दुर्दैवाने त्याच स्टेडिअमला वगळण्यात आलं आहे. अहमदाबद देशातील नवी क्रिकेट राजधानी बनत असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही स्टेडिअमध्ये चार आणि पाच सामने खेळवले जाणार आहेत. यातील एक दोन सामने इतर स्टेडिअमवर खेळवण्यात आले नसते का? असा सवालही थरुर यांनी उपस्थित केला आहे. 

नागपूरमध्ये एकही सामना नाही
उपराजधानी नागपूरात क्रिकेट वर्ल्ड कपची एकही मॅच न होणे हे निराशाजनक असल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. बीसीसीआयाने नागपूरला दोन-तीन वर्ल्ड कप सामने द्यावेत अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूरला एकही वर्ल्ड कपचा सामना होणार नसल्याने विदर्भातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे.. नागपूरला जामठा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीच्या सर्व सुविधा आणि सज्जता आहे असं असताना नागपुरात एक ही मॅच न होणे हे निराशाजनक असल्याचे देशमुख म्हणाले.